
Devendra Fadnavis
राज्यातील शेतकरीवर्गाला अतिशय आनंदाची बातमी असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत राज्य सरकारने अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका क्लिकद्वारे ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये पाठवली आहे.
ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे, त्यांच्या कर्जखात्यांमध्ये थेट लाभाची रक्कम जमा करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांची कर्जखाती नियमित करण्यात आली असून, अनेकांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.
राज्य सरकारने अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे. या टप्प्यात राज्यातील 6.22 लाख पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये एकूण 5,029 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. राज्य सरकारने यानंतर सर्व राष्ट्रीयकृत, जिल्हा मध्यवर्ती आणि सहकारी बँकांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी तातडीने नवीन पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून शेतीची कामे आर्थिक अडचणीशिवाय सुरू राहतील, असे आदेश बँकांना देण्यात आले आहेत.
‘रेस्टॉरंट्स बंद पडतील अशी वक्तव्ये करू नका’; ‘सावजी’वरून बावनकुळे आक्रमक
याशिवाय, पहिल्या यादीतील ज्या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही, त्यांची प्रक्रिया पूर्ण होताच त्यांच्याही कर्जखात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना अत्यंत सोप्या प्रक्रियेद्वारे राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना कोणताही अर्ज करण्याची आवश्यकता नसून, केवळ आधार प्रमाणीकरणाद्वारे लाभ दिला जात आहे. ग्रामपंचायतींकडे लाभार्थ्यांच्या याद्या पाठविण्यात आल्या असून, पात्र शेतकऱ्यांची कर्जखाती थेट शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, बँकांनी एनपीए खात्यांवरील व्याज माफ केल्यामुळे शासनाकडून जमा झालेली रक्कम आणि कर्जाची थकबाकी यामध्ये तफावत राहिलेली नाही. त्यामुळे संबंधित कर्जखाती पूर्णपणे निकाली निघाली आहेत. तसेच, सुमारे 12 लाख कर्जखाती तपासणीदरम्यान त्रुटींसह आढळल्याने ती संबंधित बँकांकडे दुरुस्तीसाठी परत पाठविण्यात आली आहेत. बँकांनी आवश्यक सुधारणा करून ही माहिती पुन्हा सादर केल्यानंतर त्या पात्र शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ दिला जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, आगामी खरीप हंगामासाठी आवश्यक आर्थिक मदत वेळेत उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.