
गोकुळाष्टमीपूर्वी मोठा दिलासा! दोन लाख गोविंदांना विमा संरक्षणाची शक्यता; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश
युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून राज्यातील सर्व गोविंदांना व्यापक विमा संरक्षण देण्याची मागणी केली होती. गोकुळाष्टमी आणि दहीहंडी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असून, दरवर्षी लाखो गोविंदा जीव धोक्यात घालून या उत्सवात सहभागी होतात. सरावादरम्यान तसेच प्रत्यक्ष दहीहंडी फोडताना अनेकांना गंभीर दुखापती होतात. अनेक मंडळांची आर्थिक परिस्थिती मर्यादित असल्याने उपचारांचा खर्च उचलणे कठीण जाते, त्यामुळे शासनाने विमा संरक्षण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली होती.
यापूर्वी राज्य सरकारच्या माध्यमातून सुमारे एक लाख गोविंदांना विमा संरक्षण देण्यात आले होते. मात्र यंदा हा लाभ वाढवून सुमारे दोन लाख गोविंदांपर्यंत पोहोचवावा आणि “महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन”च्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी सरनाईक यांनी केली होती. या मागणीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रावर “याप्रकरणी योग्य ती कार्यवाही करावी” अशी स्पष्ट नोंद करत संबंधित यंत्रणेला तातडीने आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश दिले.
याबाबत प्रतिक्रिया देताना पूर्वेश प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले. गोविंदांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे ही काळाची गरज असल्याचे सांगत, राज्य सरकारच्या सकारात्मक भूमिकेमुळे लाखो गोविंदांना मोठा दिलासा मिळेल आणि यंदाचा गोकुळाष्टमी व दहीहंडी उत्सव अधिक सुरक्षित वातावरणात साजरा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई, पालघर आणि राज्यातील अनेक शहरांमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणावर आयोजित केला जातो. अनेक सामाजिक संस्था, मंडळे आणि राजकीय संघटना या स्पर्धांचे आयोजन करतात. विजेत्या गोविंदा पथकांना लाखो रुपयांची बक्षिसे दिली जातात.
हंड्या फुटल्या…आता वेध गणेशाेत्सवाचे! पुणेकरांनी अनुभवला डीजेमुक्त दहीहंडीचा थरार