आजचा सत्कार सिंधुदुर्गच्या इतिहासातील काळा दिवस, कणकवली तालुक्यात राजकीय बॅनरबाजी
कणकवली: कणकवली येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय उलाथापालथ सुरु आहे. त्यातच अचानक राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेले बॅनर कणकवली तालुक्यात लावण्यात आले आहेत. “श्रीधर नाईक अमर रहे, सत्यविजय भिसे अमर रहे” असं बॅनरवर म्हटलं आहे. शिवाय आजचा सत्कार सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासातील काळा दिवस असा उल्लेख देखील बॅनरवर करण्यात आला आहे. कणकवली तालुक्यात ठिकठिकाणी अशा स्वरूपाचे बॅनर लावण्यात आले आहेत. हे बॅनर माजी आमदार परशुराम उपरकर, राजन तेली यांना उद्देशुन असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
हेदेखील वाचा- मतदानकार्ड नसलं तरी करता येणार मतदान; ‘ही’ ओळखपत्रं धरली जातील ग्राह्य, पण…
माजी आमदार परशुराम उपरकर, राजन तेली यांनी नुकताच ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर आता हे बॅनर कणकवली तालुक्यात झळकू लागले आहेत. हे बॅनर कोणी लावले आणि कोणासाठी लावले याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र ही बॅनरबाजी राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे. बॅनरवर म्हटलं आहे की, श्रीधर नाईक अमर रहे, अमर रहे! सत्यविजय भिसे अमर रहे, अमर रहे! सत्यविजय भिसे आम्हाला माफ करा. आजचा सत्कार सिंधुदुर्गच्या इतिहासातील काळा दिवस.
हेदेखील वाचा- एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीच्या वारीवर; निवडणुकीपूर्वी कामाख्या देवीचं घेतलं दर्शन
कणकवली शहरासह कणकवली तालुक्यात नांदगाव, तरेळे, कासार्डे याठिकाणी लावलेले बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या बॅनर वर “आजचा सत्कार, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासातील काळा दिवस” असा उल्लेख करत या बॅनरवर “श्रीधर नाईक अमर रहे” “सत्यविजय भिसे अमर रहे” असा उल्लेख केलेला आहे. “सत्यविजय भिसे आम्हाला माफ करा” असा देखील उल्लेख या बॅनरवर करण्यात आला आहे. या बॅनरवरील ओळीचा संदर्भ घेतला असता काल मंगळवारी शिवसेना ठाकरे गटाकडून कणकवली भगवती मंगल कार्यालय या ठिकाणी माजी आमदार परशुराम उपरकर व माजी आमदार राजन तेली यांचा सत्कार करण्यात आला.
सत्काराचा संदर्भ या बॅनर वर घेत हा बॅनर लावण्यात आल्याचे समजते. यामध्ये श्रीधर नाईक हत्येच्या गुन्ह्यात त्यावेळी परशुराम उपरकर संशयित आरोपी होते. मात्र त्यानंतर ते सदर केसमध्ये निर्दोश सुटले होते. तर सत्यविजय भिसे केसमध्ये देखील राजन तेली हे संशयित आरोपी होते. मात्र ते देखील या केसमध्ये निर्दोष सुटले होते. त्यामुळे उपरकर व तेली यांच्या सत्कारावर भाष्य करणारे बॅनर असल्याची चर्चा आहे. ठिकठिकाणी हे बॅनर कोणी लावले ? याबाबतची उत्सुकता सर्वांनाच आहे. मात्र या बॅनरमुळे आता कणकवलीमधील राजकारण तापणार का, याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.