
Harshwardhan Sapkal, Devendra Fadnavis, Missing Link Row, Samruddhi Mahamarg, Congress Vs BJP,
मिसिंग लिंकवरून झालेल्या टिकेनंतर आणि ते इन्फ्रामॅन नाही डिझास्टर मॅन आहेत हे समोर आल्यामुळे देवेंद्र फडणवीसांना राग अनावर झाला. त्यावरून त्यांनीविरोधकांवर जोरदार आगपाखडही केली. देवेंद्र फडणवीस नेहमी सांगतात की मिसिंग लिंक मी बांधला पण तुम्ही स्वत:ची शेतीवाडी किंवा कुटुंबाचे दागिने विकून मिसिंग लिंक बांधलेला नाही. एवढा मीपण आणि अहंकार योग्य नाही.” अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.
मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याच्या प्रकारानंतर राज्यभरातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका होत आहे. विरोधकांच्या नात्याने आम्हीदेखील सैंविधानिक शब्दांत टिका करत आहोत पण फडणवीसांनी विरोधाकांसाठी ‘भाडे के टट्टू’ असा शब्द वापरणे हा राज्यातील जनतेचा अपमान आहे. मिसिंग लिंकवरून टिका केल्याने लगेच फडणवीसांचा काय अपमान झाला, त्याना कोणी शिव्या दिल्या की एकेरीत बोलले, इतक्या हजार कोटींचा खर्च करूनही मिसिंग लिंक पहिल्याच पावसात गळते तेव्हा महाराष्ट्राचीच बदनामी होते. फडणवीस म्हणतात एक कोटी खोटारडे मेल्यावर काही लोकं जन्माला येतात. आता मी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान करतो की, आपल्या दोघांची नार्को टेस्ट करु. मिसिंग लिंक आणि समृद्धी महामार्गात किती भ्रष्टाचार झालाय हे समोर आले पाहिजे, अशा शब्दांत हर्षवर्धन सपकाळांनी फडणवीसांना आव्हान केलं आहे.
मिसिंग लिंकबाबत मी टिका केल्यावर फडणवीस म्हणाले की ज्याला समजत नाही, ज्याला अक्कल नाही त्याच्यावर काय बोलायचे पण हादेखील फडणवीसांचा अहंकार आहे. फडणवीस ज्या विचारांच्या पठडीतून आले आहेत त्यांचा विचार आहे की, सगळं ज्ञान आम्हालाच आहे, आम्ही सोडून सगळे निर्बुद्ध आहेत. हाच हेका फडणवीसांच्या आरोपातून पुन्हा दिसून आलात. १० वर्षांनी आम्ही असू पण विरोधक शिल्लक राहणार नाहीत, या वक्तव्यातून त्यांच्या पक्षाची विचारसरणी दिसून येते.” अशी टिकाही सपकाळ यांनी यावेळी केली.
विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मुसळधार पावसानंतर मिसिंग लिंक प्रकल्पावरून खोटी माहिती पसरवली जात आहे. इतके खोटारडे लोक पैदा झाले आहेत, एक हजार खोटारडे मेल्यानंतर हे जन्माला आले असतील,” असा टोला त्यांनी लगावला. ते पुढे म्हणाले की, “महायुती सरकारने धाडस दाखवून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण केला. मागील सरकारने हा प्रकल्प शक्य नसल्याचे सांगत अनेक कारणे दिली होती,” असा दावाही त्यांनी केला.
फडणवीस यांनी सांगितले की, “मिसिंग लिंक हा केवळ रस्ता नसून भारतातील अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना आहे. या प्रकल्पामुळे भारतातील सर्वात उंच पूल आणि जगातील मोठ्या बोगद्यांपैकी एक उभारण्यात आला असून घाट विभागातील अपघातांचे प्रमाणही कमी झाले आहे.”