महात्मा फुले चौक अखेर अतिक्रमणमुक्त! वाहतूक पोलिसांनी केली कारवाई; फुटपाथवरील दुकाने हटविली
यवतमाळ शहरातील प्रमुख आणि नेहमीच वर्दळीच्या महात्मा फुले चौक परिसरात फुटपाथवर थाटण्यात आलेल्या दुकानांमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीवर अखेर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. मंगळवारी वाहतूक पोलिस निरीक्षक देवकते यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत फुटपाथ तसेच रस्त्यालगत अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांना हटविण्यात आले. या कारवाईमुळे चौक परिसर मोकळा झाला असून वाहनांची वाहतूक काही प्रमाणात सुरळीत झाली आहे. महात्मा फुले चौक हा शहरातील महत्त्वाचा वाहतूक केंद्रबिंदू आहे. या परिसरातून दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची तसेच नागरिकांची ये-जा सुरू असते.(फोटो सौजन्य – AI)
मात्र, गेल्या काही दिवसांपासून फुटपाथवर विविध प्रकारच्या छोट्या-मोठ्या तात्पुरत्या दुकानांची संख्या वाढली होती. परिणामी पादचाऱ्यांसाठी असलेला मार्ग व्यापला जात होता. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत होते. त्याचवेळी दुकानांमध्ये खरेदीसाठी येणारे ग्राहक रस्त्याच्या कडेला वाहने उभी करीत असल्याने रस्त्याची उपलब्ध जागा आणखी कमी होत होती. यामुळे सकाळपासून रात्रीपर्यंत चौक परिसरात वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रकार वाढले होते. मंगळवारी वाहतूक पोलिसांनी अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली.
वाहतूक पोलिस निरीक्षक देवकते यांच्या नेतृत्वाखालील पथकाने महात्मा फुले चौक परिसरात कारवाई करीत फुटपाथवर दुकाने थाटलेल्या विक्रेत्यांना तेथून हटविले. रस्त्यालगत तसेच पादचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या जागेवर केलेले तात्पुरते अतिक्रमणही काढण्यात आले. यावेळी विक्रेत्यांना रस्ता किंवा फुटपाथ अडवून व्यवसाय करू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. भविष्यात पुन्हा अशा पद्धतीने अतिक्रमण करून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
फुटपाथवर दुकाने लागल्याने या परिसरातील पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत होती. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांना रस्त्यावरून मार्ग काढावा लागत होता. फुटपाथ व्यापला गेल्याने पादचारी आणि वाहनांची एकाच जागेवरून होणारी वर्दळ अपघाताचा धोका वाढविणारी ठरत होती. त्यामुळे फुटपाथ मोकळा करण्याची मागणी नागरिकांकडून होत होती. कारवाईनंतर फुटपाथचा मोठा भाग मोकळा झाला असून नागरिकांना दिलासा मिळाला.
नदी पोखरणारे रेतीमाफिया आता रडारवर! रॉयल्टीच्या दहापट दंडाची कारवाई; अवैध उत्खननाला शासनाचा दणका
महात्मा फुले चौकासह शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांविरोधात नियमित कारवाई करण्याची गरज आहे.एखादी कारवाई केल्यानंतर काही दिवसांत पुन्हा त्याच ठिकाणी दुकाने थाटली गेल्यास वाहतूक कोंडीची समस्या कायम राहण्याची शक्यता आहे.त्यामुळे अतिक्रमण हटविल्यानंतर त्या ठिकाणी सातत्याने देखरेख ठेवणे आवश्यक आहे.वाहतूक पोलिसांनीही शहरातील प्रमुख मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वेळोवेळी विशेष मोहिमा राबविण्यात येतील, असे स्पष्ट केले आहे.






