
'...तर आंबेगाव तालुक्यात एमआयडीसी उभारणार'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
पारगाव शिंगवे : आंबेगाव तालुक्यात जमीन उपलब्ध करून दिल्यास एमआयडीसी सुरू करणार आहे. यामुळे तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. ज्यावेळी शेतकऱ्यांवर संकटे येतात, त्यावेळेला सरकार शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जात असते. अतिवृष्टीच्या काळात सगळ्या अटी शर्ती बाजूला ठेवून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू केली. बहिणींना यामुळे संसाराला आधार दिला मिळाला. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील केली जाणार आहे. पुणे ते नाशिक रेल्वे होण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील बाजारतळ येथे आंबेगाव व शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतील उमेदवारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी शिवसेना सचिव रामभाऊ रेपाळे, आमदार शरद सोनवणे, संपर्कप्रमुख विजय रेपाळे, जिल्हाप्रमुख देविदास दरेकर, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आंबेगाव-शिरूर तालुक्यातील विकासकामांसाठी निधी कमी पडून देणार नाही. या विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जाणार आहे. शिंगवे येथील नागरिकांकडून उभारण्यात येत असलेली शिवशृष्टीचे काम कौतुकास्पद असून, शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी मदत केली जाणार आहे. सातगाव पठार परिसर व लोणी धामणी भागाचा विकास करणार आहे. पारगाव परिसरातील विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. शिवसेनेकडून दिलेला शब्द पाळला जातो.
जिल्हा परिषद, पंचायत समितीवरही भगवा फडकवायचाय
नगरपरिषद, नगरपंचायतीवर आपण भगवा फडकवलेला आहे. महापालिकांवर देखील आपल्या भगवा फडकला आहे. आता शिरूर व आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीवर देखील आपल्याला शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे. पारगाव जिल्हा परिषद गटातील उमेदवार अरूण गिरे व पंचायत समिती गणातील उमेदवार श्वेता ढोबळे व रोहिणी वाळुंज यांना मोठ्या मतांनी निवडून द्या, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics :”मी कामाचा माणूस आहे… राजकारणातून मतदारांना भावनिक आवाहन, पुणे जिल्ह्यात प्रचाराची दिशा बदलली