Photo : Mangal Prabhat Lodha
पुणे : आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपुरी जाण्यास निघालेले असताना एका विशेष उपक्रमासह कॅबिनेटमंत्री मंगल प्रभात लोढा देखील आज वारीमध्ये सहभागी झाले. कौशल्य विकासाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी आयटीआयच्या 5 हजार विद्यार्थ्यांसह त्यांनी पुणे येथे वारीमध्ये आपला सहभाग नोंदवला. ही कौशल्याची दिंडी पुण्यातील भैरोबानाला परिसरातून सुरु झाली.
मंगल प्रभात लोढा म्हणाले, “महायुतीचे सरकार आल्यानंतर आज प्रथमच कौशल्य दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या दिंडीच्या माध्यमातून कौशल्य विकासाचे महत्व अधोरेखित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आज रोजगाराची समस्या आपल्या सर्वांसमोरचे आव्हान आहे आणि ती सोडवण्यासाठी कौशल्य विकास विभाग मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे”.
तसेच ”आर्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची स्थापना, छत्रपती शाहू महाराज करियर मार्गदर्शन शिबीर, महारोजगार मेळावे, आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्र यासारखे भरपूर उपक्रम कौशल्य विकास विभाग राबवत आहे. महाराष्ट्र कौशल्य संपन्न व्हावा यासाठी जास्तीत जास्त तरुणांनी कौशल्य विकासाच्या, रोजगाराच्या, स्वयंरोजगाराच्या संधींचा फायदा घ्यावा हे आवाहन मी करू इच्छितो”, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, विठू माऊलीने महाराष्ट्राला सुजलाम् सुफलाम् करावे ! युवकांना कौशल्ययुक्त करण्यासाठी सर्वांना प्रेरणा द्यावी इतकंच माझं मागणं आहे. यावेळी डोक्यावर विठ्ठल रखुमाईची मूर्ती घेऊन, हरिनामाचा गजर करत मंत्री लोढा वारीमध्ये सहभागी झाले. हाती टाळ आणि मृदूंग घेत त्यांनी वारीचा आनंद घेतला.