आषाढी वारीच्या काळामध्ये लाखो प्रवाशांनी पंढरपूरसाठी एस टी बसचा वापर केला असल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली (फोटो - टीम नवराष्ट्र)
मुंबई : राज्यामध्ये नुकताच आषाढी वारी सोहळा पार पडला आहे. गावागावांतून अगदी खेड्यापाड्यातून वारकरी पंढरीला येत असतात. अनेक जण थेट पंढरपूरला जाण्यासाठी एसटी बसचा प्रवास करत असतात. त्याचप्रमाणे पूर्णपणे पायी वारी करणारे वारकरी हे परतीच्या प्रवासासाठी एसटी बसचा वापर करतात. यामुळे एस टी बस या वारकऱ्यांना विठ्ठल वारी घडवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असते. यंदाच्या वर्षी ९ लाख ७१ हजार भाविक प्रवाशांना एसटीने विठ्ठल दर्शन घडवले असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
वारीच्या काळामधील एस टी बसबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माहिती दिली आहे. आषाढी यात्रेनिमित्त ५ हजार २०० जादा बसेस देखील सोडण्यात आल्या असल्याचे देखील ते म्हणाले आहेत. बसच्या माध्यमातून एसटीने तब्बल ९ लाख ७१ हजार ६८३ भाविक – प्रवाशांची सुरक्षित ने-आण करून त्यांना विठ्ठल दर्शन घडविले आहे. या सेवेतून एसटीला ३५ कोटी ८७ लाख ६१ हजार रुपये उत्पन्न मिळाले आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे मंत्री सरनाईक म्हणाले की, “आषाढी यात्रेनिमित्त अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून श्री क्षेत्र पंढरपूर येथे मोठ्या संख्येने भाविक -प्रवाशी येत असतात. या भाविक- प्रवाशांना त्यांच्या गावापासून पंढरपूरपर्यंत ने-आण करण्यासाठी एसटीने तब्बल ५ हजार २०० जादा बसेस सोडल्या होत्या. ३ ते १० जुलै दरम्यान या बसेसनी २१ हजार ४९९ फेऱ्या करून तब्बल ९ लाख ७१ हजार ६८३ भाविक – प्रवाशांची सुरक्षित ने-आण केली आहे. यातुन एसटी महामंडळाला ३५ कोटी ८७ लाख ६१ हजार रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. जे मागील वर्षी मिळालेल्या उत्पन्नापेक्षा ६ कोटी ९६ लाख ३ हजार रुपयांनी जास्त आहे ( सन.२०२४ साली आषाढी यात्रेचे एकूण उत्पन्न २८ कोटी ९१ लाख ५८ हजार रुपये इतके होते.) अर्थात, एवढे चांगले उत्पन्न आणून लाखो भाविकांना सुखरुप देवदर्शन घडवून आणणारे हजारो चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी व त्यांना मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक व अधिकारी अभिनंदन पात्र आहेत,” अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
हजारो एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था
आषाढी यात्रेच्या काळामध्ये पंढरपूर मध्ये येणाऱ्या एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांची जेवणं अभावी गैरसोय होऊ नये, म्हणून परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्वखर्चातून ५,६ व ७ जुलै रोजी मोफत जेवण, चहा -नाश्त्याची सोय केली होती. याचा फायदा हजारो एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला.