
Dharmaveer Anand Dighe: "आनंद दिघेंना मोठ्या पदावर बसवले तर...'' संजय शिरसाट यांचा खळबळजनक आरोप
मुंबई: धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावरील ‘धर्मवीर – २’ हा चित्रपट नुकताच सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. धर्मवीर’च्या घवघवीत यशानंतर प्रेक्षकांच्या भेटीला ‘धर्मवीर २’ आला आहे. मात्र या चित्रपटावरून राज्यात राजकारण केले जात आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा चित्रपट प्रदर्शित झाल्याने विरोधक हा विषय उचलून धरत आहेत. दरम्यान शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी काल दिघे साहेब यांना मारले गेले हे संपूर्ण ठाण्याला माहिती आहे, असे खळबळजनक वक्तव्य केले होते. दरम्यान आजही त्यांनी या विषयावर भाष्य केले आहे. दिघे साहेब किंग होतयात हे कोणाला तरी खुपत होते, असे विधान शिरसाट यांनी केले आहे,
शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट म्हणाले, ”मी काल आनंद दिघे साहेब यांच्या मृत्यूबद्दल भाष्य केले आहे. त्यावर राज्यभर प्रतिक्रिया आल्या. मात्र मला जी शंका वाटली त्यावर मी बोललो. दिघे साहेब यांच्यावर बाळासाहेब ठाकरेंचे अतोनात प्रेम होते. दिघे साहेबांनी कधीही बाळासाहेबांच्या बाजूला देखील बसण्याची हिंमत केली नाही. मात्र दिघे साहेब किंग होतयात याची खुन्नस काही जणांना वाटत होती. त्यामुळे हे सर्व झाले.”
पुढे बोलताना संजय शिरसाट म्हणाले, ”आनंद दिघेंना मोठ्या पदावर बसवले तर आपल्याला अडचण होऊ शकते, अशा लोकांनी त्यांचा काटा काढला. मी अशी अनेक प्रकरण उघड करण्याची ताकद ठेवतो. आज ती लोक त्यावेळेस केले तसे राजकारण करत आहेत. त्या लोकांमुळेच राणे, भुजबळ, राज ठाकरे यांनी पक्ष सोडला. पक्ष सोडलेली लोक शिवसेनाप्रमुखांच्या विरोधात नव्हती. इतर काही जणांमुळे ती गेली.एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना त्यांना नक्षल्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. एवढ्या धमक्या येऊनही त्यांना सुरक्षा का पुरवली गेली नाही? मात्र शिंदे खंबीर होते. त्यांना झेड प्लस सुरक्षा नाकारणे या मागचे नक्की काय कारण होते? ”
‘धर्मवीर २’ची धमाकेदार सुरूवात
स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित असलेला ‘धर्मवीर २’ अखेर बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. चित्रपट २७ सप्टेंबर देशासह परदेशात रिलीज झालेला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना मराठी आणि हिंदी भाषेत पाहायला मिळणार आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. प्रवीण विठ्ठल तरडे दिग्दर्शित चित्रपटाची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. काही तासांपूर्वीच झी स्टुडिओज कडून चित्रपटाच्या कमाईचा अधिकृत आकडा जाहीर करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठी चित्रपटांना प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळत आहे. इतर चित्रपटांप्रमाणेच प्रेक्षकांनी ” ‘धर्मवीर २’ मुक्काम पोस्ट ठाणे, साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट” चित्रपटालाही उत्तम प्रतिसाद दिला आहे. मुख्य बाब म्हणजे चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी २०२४ या वर्षातला सर्वाधिक कमाई करणारा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी तब्बल १ कोटी ९२ लाखांची कमाई केलेली आहे.