
जागतिक नेतृत्वात पंतप्रधान मोदी अव्वल! लोवी इन्स्टिट्यूटच्या सर्वेक्षणाचा एकनाथ शिंदेंकडून गौरव
या सर्वेक्षणात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यासारख्या बलाढ्य नेत्यांनाही मोदी यांनी मागे टाकल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भारताच्या नेतृत्वाकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन किती बदलला आहे, याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे.
एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, मोदी यांनी “राष्ट्र प्रथम” या भूमिकेतून घेतलेल्या निर्णयांमुळे भारताची ओळख केवळ विकसनशील देश म्हणून राहिलेली नाही, तर जागतिक घडामोडींना दिशा देणाऱ्या प्रभावी शक्ती म्हणून निर्माण झाली आहे. जगातील महत्त्वाच्या प्रश्नांवर भारताची भूमिका आता निर्णायक मानली जात आहे. एकेकाळी महासत्तांच्या निर्णयांचा प्रभाव स्वीकारणारा भारत आज जागतिक शक्ती-संतुलन घडविणाऱ्या देशांच्या पहिल्या रांगेत जाऊन उभा राहिला आहे.
‘लोवी इन्स्टिट्यूट’च्या अहवालातील आकडेवारीनुसार जागतिक शक्तीच्या समीकरणांमध्ये भारताची झेप लक्षणीय ठरत असून, चीन, अमेरिका आणि रशियासारख्या महासत्तांनाही भारताच्या वाढत्या प्रभावाची दखल घ्यावी लागत आहे. संरक्षण, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, परराष्ट्र धोरण आणि जागतिक मुत्सद्देगिरी या सर्व क्षेत्रांत भारताने केलेली प्रगती जगाला आश्चर्यचकित करणारी असल्याचे या अहवालातून स्पष्ट होते.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले की, “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास” या मंत्राला प्रत्यक्ष कृतीची जोड देत मोदी यांनी १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षांना नवी दिशा दिली आहे. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे भारत आज आत्मविश्वासाने जगासमोर उभा आहे. देशाचा सन्मान, स्वाभिमान आणि सामर्थ्य वाढविण्याचे काम मोदी यांनी सातत्याने केले आहे. “आज जग भारताकडे केवळ एक मोठी बाजारपेठ म्हणून पाहत नाही, तर भविष्यातील जागतिक नेतृत्व करणाऱ्या राष्ट्राच्या नजरेने पाहत आहे. ही बदललेली प्रतिमा आणि वाढलेला प्रभाव मोदी यांच्या अथक परिश्रमांचा व राष्ट्रहिताला दिलेल्या सर्वोच्च प्राधान्याचा परिणाम आहे,” असेही शिंदे म्हणाले.
या ऐतिहासिक यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, “भारताला विश्वगुरूपदाच्या दिशेने नेणाऱ्या या नेतृत्वाचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचा तिरंगा केवळ देशातच नव्हे तर जागतिक व्यासपीठावरही अधिक उंच फडकत आहे. हा क्षण प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा, आत्मविश्वासाचा आणि नव्या भारताच्या उदयाचा आहे.”