कल्याण : गणेशोत्सवाला एक दिवस शिल्लक राहिला आहे, त्यामुळे आता रस्त्यांवर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्याचबरोबर खड्डे असल्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होणार आहे. याचकारणामुळे आमदार विश्वनाथ भोईर, केडीएमसी आयुक्त आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांची बैठक पार पडली, यावेळी गणेशोत्सवाच्या एक दिवस आधी कल्याणमध्ये रस्त्यांवर पडलेले सर्व खड्डे काहीही करून भरण्याचे अल्टीमेटम आमदार विश्वनाथ भोईर यांनी केडीएमसी प्रशासनाला दिला आहे.
यावेळी आमदार विश्वनाथ भोईर म्हणाले की, गणेशोत्सवापूर्वी हे खड्डे भरले गेले नाहीत, तर आम्ही शिवसैनिक आहोत जे काही करायचे ते आम्ही करूच अशा शब्दांत आमदार भोईर यांनी केडीएमसी आयुक्तांची कानउघाडणी केली. अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आमदार भोईर यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण पश्चिमेत रस्त्यांवर पडलेले खड्डे, अस्वच्छता, रिंगरोडचे, स्मार्टसिटीचे काम आदी प्रमूख मुद्द्यांवर केडीएमसी आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांची भेट घेत हे अल्टीमेटम दिले.
हेदेखील वाचा – दुलीप ट्रॉफीमध्ये शतक ठोकणारा मुशीर खान IPL 2025 मध्ये या संघामधून खेळणार, लिलावापूर्वी मोठा खुलासा
कल्याणचा सार्वजनिक गणेशोत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक कल्याणातील गणेशोत्सव आणि त्यात सादर केलेले देखावे पाहण्यासाठी येत असतात. त्यामुळे कल्याण शहरातील रस्ते आणि स्वच्छतेच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नाही असा सज्जड इशारा आमदार भोईर यांनी केडीएमसी प्रशासनाला दिला आहे. तसेच कल्याण शहर हे नावाला नाही तर प्रत्यक्षात खरोखर हे शहर स्मार्ट वाटले पाहिजे, सर्व रस्ते व्यवस्थित दिसले पाहिजेत, सगळीकडे स्वच्छता दिसली पाहिजे असेही त्यांनी या बैठकीत केडीएमसी अधिकाऱ्यांना खडसावून सांगितले.
या बैठकीला आमदार विश्वनाथ भोईर, केडीएमसी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, माजी नगरसेवक प्रभूनाथ भोईर, संजय पाटील, सुनिल वायले, जयवंत भोईर, मोहन उगले, विद्याधर भोईर यांच्यासह नितीन माने, विजय देशेकर, रामदास कारभारी, डॉ. धीरज पाटील आणि केडीएमसीचे प्रमूख अधिकारी उपस्थित होते.