Navneet Rana- Yashomati Thakur
अमरावती : अमरावती (Amravti News) खासदार कार्यालय ताब्यात घेण्यासाठी शनिवारी (२२जून) मोठा गोंधळ झाला. अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या खासदार जनसंपर्क कार्यालयाचे कुलूप तोडून काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी ताबा घेतला. या प्रकरणात वानखेडे आणि ठाकूर यांच्यासह १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर या कार्यालयाला पुन्हा सील करण्यात आले आहे. त्यामुळे आता हे कार्यालय नेमके कुणाचे असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, माजी खासदार नवनीत राणा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे हे पत्र सुपूर्द केले. पण या सर्व प्रकरणात राणांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहीलेल्या पत्रामुळे एक नवा ट्विस्ट आला आहे. राणांनी पत्रात हे खासदार जनसंपर्क कार्यालय काँग्रेसला देण्याची विनंती केली आहे.
नवनीत राणांनी लिहीलेल्या पत्रात त्यांच्या ताब्यात असलेले खासदार कार्यालय परत करत असल्याचे सांगतिले होते. तसेच हे कार्यालय काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे यांना देण्याची विनंतीही केली.
जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात नवनीत राणा म्हणाल्या की, “मी सर्वप्रथम अमरावती जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांचे विजयाबद्दल अभिनंदन करते आणि भविष्यातील जिल्हयाच्या यशस्वी विकास कामांसाठी शुभेच्छा देते. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेले खासदार जनसंपर्क कार्यालय हे जिल्हयातील शेतकरी, शेतमजूर आणि सर्व सामान्य जनतेच्या कामासाठी होते. त्यामुळे भविष्यातही नवनिर्वाचित खासदाराच्या जनसंपर्क कार्यालयातून सर्व सामान्य जनतेची आणि शेतकऱ्यांची कामे व्हावीत. या अपेक्षेसह खासदार जनसंपर्क कार्यालयाची चावी मी या पत्रासोबत आपल्याकडे सुपूर्त करत आहे. कृपया आपल्या माध्यमातून खासदार बळवंत वानखडे यांना ही चावी सुपूर्त करावी, ही विनंती करते. आपल्या सहकार्याची अपेक्षा.”
दरम्यान, निवडणुकीच्या निकालानंतर यशोमती ठाकूर यांनी पत्रव्यवहार करून खासदार कार्यालयाचा ताबा मागितला होता. पण नवनीत राणांनी ताबा देण्यास टाळाटाळ केल्याची बातमीही प्रसिद्ध झाली होती. यानंतरच काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत खासदार कार्यालयाचा ताबा घेतल्याची चर्चा अमरावतीच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.