
वाई–पाचगणी रस्त्यावरील कोट्यवधींच्या कामाचा बोजवारा; नागरिकांच्या जिवाशी खेळ, प्रशासन मात्र गप्प!
वाई : वाई-पाचगणी मार्गावरील रस्त्याच्या कामातील गंभीर त्रुटींमुळे स्थानिक नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. तब्बल सहा महिने धुळीचे साम्राज्य, खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान, अपघातांचा धोका आणि प्रदूषणामुळे नागरिकांसह मुक्या जनावरांनी प्रचंड हाल सोसले. एवढा त्रास सहन केल्यानंतर तरी दर्जेदार रस्ता मिळेल, अशी अपेक्षा होती; मात्र, प्रत्यक्षात निकृष्ट काम आणि नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच पडली आहे.
कंत्राटदाराने रस्त्याची उंची वाढवून अर्धवट काँक्रीटीकरण केले; परंतु सर्वात मूलभूत असलेली पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था पूर्णपणे दुर्लक्षित केली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गटारे न बांधल्यामुळे रस्ता उंच झाला आणि आजूबाजूची घरे, अंगणे तसेच जनावरांचे गोठे सखल भागात गेले. परिणामी, मुसळधार पाऊस पडताच संपूर्ण पाणी थेट नागरिकांच्या घरात आणि गोठ्यांमध्ये शिरत असून मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
याहून धक्कादायक बाब म्हणजे अवघ्या एक महिन्यापूर्वी पूर्ण झालेल्या काँक्रीट रस्त्यावर आजच भेगा पडू लागल्या आहेत. अनेक ठिकाणी काँक्रीटचे टवके उडाले असून कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या रस्त्याची इतक्या कमी कालावधीत झालेली दुरवस्था ही कंत्राटदाराच्या निष्काळजीपणाची आणि संबंधित विभागाच्या ढिसाळ देखरेखीची साक्ष देणारी आहे.
स्थानिक नागरिकांचा सवाल अत्यंत रास्त आहे. कर वेळेवर भरणाऱ्या जनतेला निकृष्ट दर्जाची कामे आणि प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनाची शिक्षा का भोगावी? काम पूर्ण होण्यापूर्वी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली होती का? दर्जा तपासणी झाली होती का? दोषी कंत्राटदारावर कारवाई होणार का? या प्रश्नांची उत्तरे देण्यास प्रशासनाकडे शब्दही उरलेला दिसत नाही.
दरम्यान, पावसाळ्यात घरांमध्ये साचणारे पाणी, जनावरांचे होणारे हाल, वाढलेला आजारांचा धोका आणि नव्या रस्त्याची उघड झालेली निकृष्ट गुणवत्ता यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. संबंधित विभागाने तातडीने गटारांची उभारणी करून रस्त्यावरील सर्व दोष दूर करावेत, तसेच निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
“अवघ्या एका महिन्यात भेगा पडणारा रस्ता किती दिवस टिकणार?” हा प्रश्न आता प्रत्येक नागरिकाच्या मनात घर करून बसला असून, प्रशासनाने यापुढेही मौन बाळगल्यास तीव्र लोकआंदोलन उभे राहण्याची चिन्हे दिसत आहेत