रस्त्याअभावी ग्रामीणमधील बसफेऱ्या बंद! विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; पूल खचल्याने गावाचा संपर्क तुटला
यंदा पावसाळा सुरू होताच जिल्ह्यातील अनेक ग्रामीण रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खराब रस्त्यांचा थेट फटका महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बससेवेला बसताना दिसत आहे. ग्रामीण भागातील रस्ते चिखलमय होणे, त्यावर खोल खड्डे आणि दोन संपर्क मार्गावरील पूल खचल्याने जिल्ह्यात तब्बल ३० पेक्षा जास्त ग्रामीण मार्गांवर एसटी बसफेऱ्या बंद असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. मात्र एसटी विभागाकडून अधिकृतपणे याला दुजोरा देण्यात आला नाही. यंदा पावसाळा सुरू होताच जिल्ह्यातील अनेक दुर्गम भागात वेळेवर एसटी बसेस पोहोचत नसल्याने शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार ग्रामीण भागातून होत आहे.(फोटो सौजन्य – AI)
पावसाळ्यात आपात्कालीन परिस्थिती पाहता आणि एसटी बसेस सुरक्षित ठेवण्यासाठी काही मार्गांवर एसटी फेऱ्या अधूनमधून स्थगित करण्यात आल्या. ज्या मार्गावर रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे किंवा तेथील पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे, अशारस्त्यांवरून एसटी बसेस चालविणे शक्य नसते. अशावेळी बसफेरी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात येते.अनेक गावात बसफेऱ्या बंद असल्याने ग्रामीण भागातील शेतकरी शेतीकामानिमित्त बाजारपेठेला जाण्यासाठी आणि नागरिक, शाळकरी मुले खाजगी जीप, ऑटो, दुचाकी किंवा ट्रॅक्टरच्या साहाय्याने प्रवास करत आहेत. यामुळे प्रवासाचा खर्च वाढला असून वेळेचेही नुकसान होत आहे.
ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांच्या दुरवस्था तसेच लहान नदी, नाले आणि पुलांच्या नुकसानीमुळे जिल्ह्यात काही ग्रामीण मार्गावरील बसफेऱ्यांवर परिणाम झाला आहे. पांढरकवडा तालुक्यातील दुर्गम आदिवासी गाव मार्ग तसेच झरी-जामणी परिसरातील काही अंतर्गत मार्गांचा यात समावेश आहे.
महागाव तालुक्यातील ग्रामीण मार्ग उमरखेड तालुक्यातील बंदी भागातील गावांना जोडणारे मार्ग आणि दिग्रस व आर्णी तालुक्यात ग्रामीण भागात ४ ते ५ गावामध्ये बसफेऱ्या सध्या बंद असल्याची माहिती एसटी महामंडळातील सूत्रांनी दिली.
गत आठवड्यात जोरदार पावसाने महागाव, दार, व्हा उमरखेड तालुक्यात २ लहान पुलांचे नुकसान झाले. त्यामुळे एसटी बसफेऱ्या दोन्ही मार्गावर बंद ठेवावी लागली.
या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पूल दुरुस्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
हे पूल वाहतुकीसाठी सुरक्षित झाल्यावरच बससेवा येथून पुन्हा सुरू करण्यात येईल.






