
Satara News : ऐन पावळ्यात मसूर येथील रस्त्याच्या कामाला सुरुवात; नागरिकांना धरलं जातंय वेठीस
मसूर / गजानन गिरी : मल्हारपेठ-पंढरपूर राज्य महामार्गाच्या सुरू असलेल्या निकृष्ट कामाबाबत कंत्राटदाराचा बेजबदारपणा, हलगर्जीपणा…कंत्राटदारास सार्वजनिक बांधकाम खात्याचा वरदहस्त…ऐन पावसाळ्यात रस्त्याचे काम…चिखलाचा राडारोडा…वाहने घसरण्याचे प्रकार…वाहतुकीची कोंडी…अशा विविध कारणांची किनार लाभलेल्या मसूरमध्ये सुरू असलेले रस्त्याचे काम बहुचर्चित, संतप्त, आंदोलनात्मक विचाराला प्रवृत्त करणारे ठरत आहे. एकंदरीत कंत्राटदाराचा गलथानपणा त्रासदायकच ठरला आहे.
ऐन पावसाळ्यात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना अक्षरशः वेठीस धरले गेले आहे. रस्त्यावर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरल्याने दुचाकीस्वारांचा तोल जाऊन रोज अपघात घडत आहेत. अनेकजण चिखलात व गटारात पडत आहेत. जखमी होत आहेत. महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. चारचाकी व अवजड वाहनांचीही चिखलात अडकून पडत आहेत.
एकंदरीत वाहतुकीचा पूर्णत: बोजवारा उडाला आहे. परिणामी, वाहतूक कोंडी नित्याची बाब बनली आहे. या वाहतूक कोंडीमुळे वाहने गावातून वळवली जात असल्याने गावातही वाहतुकीच्या कोंडीचा त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे. त्यातच रस्त्याच्या बाजूने गटारीसाठी केलेले खोदकाम अपूर्ण अवस्थेत सोडल्याने त्यात पावसाचे पाणी साचून मोठमोठी डबकी तयार झाली आहेत. त्यामुळे परिसरात अस्वच्छता वाढली. डासांचा फैलाव वाढला. साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला.
कंत्राटदाराची उन्हाळ्यात झोप अन् पावसाळ्यात जाग
उन्हाळ्याच्या काळात रस्त्याचे काम पूर्ण करण्याची संधी असताना कंत्राटदाराने दिरंगाई केली. आता ऐन पावसाळ्यात रस्ता उकरून ठेवत यंत्रसामग्रीच्या माध्यमातून काम सुरू असल्याने नागरिकांना चिखल, वाहतूक कोंडी, अपघातांचा सामना करावा लागत आहे. एकंदरीत कंत्राटदाराने जनतेशी क्रूर थट्टाच करत जनतेला मोठी शिक्षा दिल्याची भावना नागरिकांमध्ये उमटली आहे.
अधिकारी अन् कंत्राटदार यांच्यात नेमके कोणते हितसंबंधॽ
रस्त्याच्या सर्व बाबीस कंत्राटदारच जबाबदार आहे. त्यातच सार्वजनिक बांधकाम विभागाचे मूक समर्थन सर्व काही सांगून जाते. बांधकाम खात्याच्या वरदहस्तामुळे कंत्राटदारास निकृष्ट कामाचे, निष्काळजीपणाचे बेजबाबदारपणाचे बळ मिळाले. हे सांगायला कुण्या कडबुड्या ज्योतिषाची गरज नाही. कंत्राटदारावर कारवाई करण्याऐवजी त्याला अभय दिले जात आहे का? अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यात नेमके कोणते हितसंबंध आहेत, याबाबतचे उत्तर निरूत्तरच ठरले आहे. याची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
चिखलमय रस्त्यात वृक्षारोपण
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कराड तालुकाप्रमुख संजय भोसले यांनी प्रशासनाला अल्पकाळात तातडीने रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे मार्गी लागले नाहीतर या चिखलमय रस्त्यात वृक्षारोपण करून अनोखे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी संबंधित कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाची राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.