
मुंबई-पुणे प्रवास जलद होणार
बोरघाट धोकादायक वळणं दूर
मुंबई–पुणे ‘मिसिंग लिंक’ मे महिन्यात होणार सुरू
पुणे: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील बहुप्रतिक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प येत्या मे महिन्याच्या सुरवातीला पूर्ण होणार असल्याची माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाकडून देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे बोरघाटातील तीव्र वळणं, अपघातप्रवण उतार-चढाव यांचा प्रश्न कायमचा सुटणार असून, मुंबई आणि पुणे दरम्यानचा प्रवास अधिक सुरक्षित, सुकर आणि वेळ वाचवणारा ठरणार आहे.
‘मिसिंग लिंक’ प्रकल्प खोपोलीजवळील बोरघाट परिसरात उभारण्यात येत आहे. सध्याच्या मार्गावर तीव्र वळणांमुळे वाहतूक कोंडी, अपघातांचे प्रमाण आणि प्रवासाचा कालावधी वाढतो. ही अडचण दूर करण्यासाठी सुमारे १३.३ किमी लांबीचा पर्यायी मार्ग विकसित केला जात आहे. या मार्गात लांब बोगदे आणि उंच ‘केबल स्टे’ पूल यांचा समावेश आहे. परिणामी, सध्याच्या मार्गापेक्षा सुमारे ६ किमी अंतर कमी होणार आहे. प्रकल्पासाठी ६,५९५ कोटी रुपये खर्च आला आहे.
प्रकल्पाचे तंत्रज्ञान आणि सुरक्षितता
प्रकल्पात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. दोन मोठे बोगदे, केबल-स्टे पूल, भूस्खलन प्रतिबंधक संरचना, तसेच पावसाळ्यातही सुरक्षित वाहतूक होईल अशी ड्रेनेज व्यवस्था उभारण्यात आली आहे. बोगद्यांमध्ये आधुनिक प्रकाशयोजना, वायुवीजन प्रणाली, सीसीटीव्ही कॅमेरे, आपत्कालीन संपर्क यंत्रणा आणि अग्निसुरक्षा सुविधा बसवण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाहनचालकांसाठी मार्ग अधिक सुरक्षित ठरणार आहे.
कामाची प्रगती
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, प्रकल्पाच्या बहुतांश नागरी कामांना अंतिम टप्प्यात पोहोचण्यात आले आहे. रस्त्याचे डांबरीकरण, सुरक्षारेषा, सूचना फलक तसेच चाचणीचे काम एप्रिलमध्ये पूर्ण होणार आहे. त्यानंतर आवश्यक तांत्रिक तपासणी करून मार्ग मे महिन्याच्या सुरवातीला वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. प्रशासनाचा भर पावसाळ्यापूर्वी मार्ग सुरू करण्यावर आहे.
सरासरी २०–२५ मिनिटांनी कमी होणार
‘मिसिंग लिंक’मुळे मुंबई–पुणे प्रवासाचा कालावधी सरासरी २०–२५ मिनिटांनी कमी होणार आहे. विशेषतः अवजड वाहनांसाठी हा मार्ग मोठा दिलासा ठरणार आहे. इंधनाची बचत, वाहतूक कोंडी कमी होणे आणि कार्बन उत्सर्जनात घट या प्रकल्पामुळे साध्य होईल. औद्योगिक वाहतूक, पर्यटन आणि आपत्कालीन सेवा यांनाही मोठा लाभ मिळणार आहे.स्थानिक नागरिक, प्रवासी आणि वाहनचालकांमध्ये या प्रकल्पाबाबत उत्सुकता आहे. सुरवातीला कोविड, भूस्खलन, अतिवृष्टी आणि तांत्रिक अडचणींमुळे कामास विलंब झाला होता; मात्र आता अंतिम टप्प्यात पोहोचल्याने मे महिन्यात मार्ग खुला होण्याची शक्यता बळावली आहे. ‘मिसिंग लिंक’ सुरू झाल्यानंतर मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग अधिक सक्षम आणि सुरक्षित होणार असून, राज्याच्या पायाभूत सुविधांमध्ये हा प्रकल्प मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.