
रस्त्यांवरील झाडांचा गुदमरतोय श्वास! मुंबईत 'डी-काँक्रिटीकरण' करा, वॉचडॉग फाउंडेशनची मागणी
मुंबईतील रस्त्यांच्या कडेला आणि पदपथांवर असलेल्या झाडांच्या सभोवताली मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या काँक्रिटीकरणामुळे झाडांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. दादर (पश्चिम) येथील गोखले रोडवरील अनेक जुनी आणि मोठी झाडे काँक्रिट आणि पेव्हर ब्लॉकच्या विळख्यात पूर्णपणे अडकल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. या गंभीर समस्येकडे वॉचडॉग फाउंडेशन संस्थेने लक्ष वेधत मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र लिहून संपूर्ण मुंबईत तातडीने ‘डी-काँक्रिटीकरण’ मोहीम राबवण्याची मागणी केली आहे.(फोटो सौजन्य – AI)
‘वॉचडॉग फाउंडेशन’चे गॉडफ्रे पिमेंटा यांनी ३ जुलै २०२६ रोजी गोखले रोडवरील पदपथांची पाहणी केली असता, अनेक झाडांच्या बुंध्याभोवती थोडीही जागा न सोडता थेट काँक्रिटआणि पेव्हर ब्लॉक्स बसवण्यात आल्याचे दिसून आले. झाडांच्या मुळांना हवा मिळण्यासाठी आणि पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी पुरेशी मोकळी मातीच शिल्लक ठेवलेली नाही. यामुळे झाडे हळूहळू कमकुवत होऊन वाळत असून, मुंबईत पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर वृक्ष पडण्यामागच्या घटनांमागे हे अति-काँक्रिटीकरण आणि झाडांची योग्य काळजी न घेणे हेच मुख्य कारण असल्याचे संस्थेने म्हटले आहे.
राष्ट्रीय हरित लवादने २०१३ मध्ये दिलेल्या आदेशांचे उघड उल्लंघन आहे. लवादाने कोणत्याही झाडाच्या बुंध्याभोवती किमान १ मीटर (३ फूट) अंतरापर्यंत कॉक्रिटीकरण करण्यास सक्त मनाई केली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयानेही ‘कलम २१’ नुसार पर्यावरण संरक्षण हा नागरिकांच्या जगण्याच्या अधिकाराचा भाग असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, मुंबईत कंत्राटदार आणि पालिकेच्या अभियंत्यांकडून या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे या पाहणीतून स्पष्ट झाले आहे.
या पार्श्वभूमीवर, पालिकेने संपूर्ण मुंबईतील रस्त्यांच्या कडेला असलेल्या झाडांची तात्काळ संयुक्त पाहणी करावी, अशी मागणी पिमेंटा यांनी केली आहे. प्रत्येक झाडाच्या बुंध्याभोवतीचे किमान १ मीटर अंतरावरील काँक्रिट काढून तिथे मोकळी माती व खत टाकावे, जेणेकरून पाणी जमिनीत मुरेल. तसेच रस्ते आणि पदपथांचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना झाडांभोवती जागा सोडण्याचे कडक नियम लागू करावेत, केवळ रस्तेच नव्हे, तर अनेक गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारातही मोठ्या प्रमाणावर कॉक्रिटीकरण झाले असल्याने तिथेही ‘ट्री ऑडिट’ करून डी-कॉक्रिटीकरण मोहीम हाती घ्यावी, असेही पत्रात नमूद केले आहे. मुंबईतील जुनी झाडे हे शहराचे वैभव आणि फुफ्फुसे आहेत, विकासकामांच्या नावाखाली त्यांचा असा गळा घोटणे म्हणजे पर्यावरणाची मोठी हानी आहे, असे मत पिमेंटा यांनी व्यक्त केले आहे.