
बोरिवली तहसील कार्यालयात बनावट शिक्क्यांचा वापर; उत्पन्न दाखल्यांच्या ३० अर्जांवर संशय
बोरिवली तहसील कार्यालयात आलेल्या उत्पन्न दाखल्यांच्या अजाँची नियमित पडताळणी करताना काही अर्जावरील शिक्के आणि स्वाक्षऱ्यांबाबत अधिकाऱ्यांना संशय आला. त्यानंतर संबंधित कागदपत्रांची सखोल छाननी करण्यात आली. या छाननीत सुमारे ३० अर्जामध्ये वापरण्यात आलेले शिक्के व स्वाक्षऱ्या संशयास्पद असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत बोरिवलीच्या तहसीलदार संयोगिता बाविस्कर यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, संबंधित प्रकरणाचा तपास सायबर पोलीस करीत आहेत.
अधिकृत प्रक्रियेद्वारेच अर्ज सादर करा
दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना कोणत्याही अनधिकृत व्यक्ती किंवा एजंटच्या माध्यमातून कागदपत्रे तयार करून न घेता, केवळ अधिकृत प्रक्रियेद्वारेच दाखल्यांसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणातील सर्व बाबींचा सायबर पोलिसांकडून तपास सुरू असून, तपासानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे केले सादर
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे सादर करण्यात आले होते. त्यामुळे अर्ज अपलोड करण्यासाठी वापरण्यात आलेले डिजिटल आयडी आणि आयपी अँड्रेसच्या आधारे तपास सुरू आहे. तपासाचा भाग म्हणून काही ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांमधील नोंदींची पडताळणी तसेच संबंधित व्यक्तींकडून माहिती घेतली जात असल्याचे समजते. मात्र, या प्रकरणात कोणाचीही जबाबदारी अद्याप निश्चित झालेली नसून तपास पूर्ण झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
कठोर कारवाईचा इशारा
याबाबत तहसीलदार संयोगिता बाविस्कर यांनी सांगितले की, ‘शासकीय कामकाजात पारदर्शकता अत्यंत महत्वाची आहे. बनावट कागदपत्रे किंवा खोट्या स्वाक्षऱ्यांच्या माध्यमातून शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन तपास केला जाईल.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)