
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचे आवाहन! (Photo Credit - X)
मुंबई, दि. 21: आर्थिक क्षेत्रातील ‘हक्क न सांगितलेल्या मालमत्ता निपटारा’ मोहीम केवळ वित्तीय क्षेत्रासाठीच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांसाठीही अत्यंत उपयुक्त आहे. नागरिकांनी या महत्त्वाकांक्षी मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.
वित्तीय सेवा विभाग, अर्थ मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या सूचनेनुसार राज्यस्तरीय बँकर्स समिती (एसएलबीसी) महाराष्ट्र आणि जिल्हा अग्रणी बँकेतर्फे राज्यात या उपक्रमांतर्गत शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई उपनगरमधील या शिबिराचा शुभारंभ जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते वांद्रे (पूर्व) येथील उत्तर भारतीय संघ सभागृहात झाला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) मुख्य महाव्यवस्थापक पुनीत पंछोली, कॅनरा बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक रणजीव कुमार, बँक ऑफ बडोदाचे महाव्यवस्थापक सुनीलकुमार शर्मा, युको बँकेचे महाव्यवस्थापक संदीप कुमार, आणि पंजाब नॅशनल बँकेचे महाव्यवस्थापक उत्तम कुमार आदी मान्यवर उपस्थित होते.
मोहिमेचा उद्देश: निष्क्रिय मालमत्तेची माहिती हक्कदारांपर्यंत पोहोचवणे
या उपक्रमाचा मुख्य उद्देश विविध बँका व वित्तीय संस्थांमधील दीर्घ काळापासून निष्क्रिय किंवा दावा न केलेल्या ठेवी, शेअर्स, लाभांश, विमा पॉलिसी, भविष्य निर्वाह निधी (PF) यांसारख्या मालमत्तेबाबत जनजागृती करणे आणि योग्य हक्कदारांना माहिती उपलब्ध करून देणे हा आहे. मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन, रिझर्व्ह बँक आणि सहभागी सर्व बँकांच्या संयुक्त प्रयत्नातून ही मोहीम अधिक व्यापक स्वरूपात राबवण्यात येत आहे.
निष्क्रिय रक्कम परत मिळवण्यासाठी लाभ घ्या
जिल्हाधिकारी कटियार म्हणाले की, शहरी आणि ग्रामीण भागातील ग्राहक अनेकदा बँक व्यवहाराच्या प्रक्रियेत अनभिज्ञ असतात. माहितीअभावी किंवा प्रक्रियेची अज्ञानता यामुळे बँकांमधील खातेदारांची निष्क्रिय रक्कम उपयोगात येत नाही. ती ग्राहकांना सुलभरित्या मिळावी या व्यापक उद्देशाने ही मोहीम राबवण्यात येत आहे.
ऑक्टोबरपासून सुरू झालेली ही मोहीम डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या शिबिरात सहभागी होऊन स्वतःची किंवा कुटुंबीयांची अनाकलनीय ठेवी व वित्तीय मालमत्ता तपासावी आणि आवश्यक दावा सादर करावा. बँक ग्राहकांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळवून देण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.
नामनिर्देशन आणि ‘उदगम’ पोर्टल महत्त्वाचे
रिझर्व्ह बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक पुनीत पंछोली म्हणाले की, दावा नसलेला ग्राहकांचा पैसा त्यांना परत मिळावा यासाठी ही मोहीम आहे. अनेक खातेधारकांनी नामनिर्देशन नमूद केलेले नसल्याने बँकांना खातेदारांचे पैसे परत करण्यात अडचणी येतात.
नामनिर्देशन पूर्ण करा: खातेधारकांनी आपल्या संबंधित माहिती, नामनिर्देशन या सर्व बाबींची पूर्तता करण्याची खबरदारी घ्यावी.
‘उदगम’ पोर्टलचा वापर करा: खातेदारांच्या सोयीसाठी ‘उदगम’ (UDGAM) पोर्टल खूप उपयुक्त असून त्यावरून सध्याच्या तसेच जुन्या खात्याची माहिती मिळते, त्याचा लाभ घ्यावा.
खाते सक्रिय ठेवा: सर्व खातेधारकांनी आपले बँक खाते सक्रिय ठेवावे, केवायसी (KYC), संपर्क क्रमांक, पत्ता हा तपशील वेळोवेळी अद्ययावत करावा आणि खात्याच्या व्यवहाराबाबत सतर्क राहावे.
पंछोली यांनी यावेळी बँकांना ग्राहकांना आवश्यक मार्गदर्शन आणि सहकार्य करण्याचे आवाहन केले.
शिबिरात थेट मार्गदर्शन आणि स्टॉल्स
या मोहिमेत नागरिकांनी उत्साहाने भाग घेतला. दीर्घ काळापासून पडून असलेल्या मालमत्ता परत मिळवण्यासाठी आवश्यक प्रक्रियेचे मार्गदर्शन मिळाल्याने अनेकांना प्रत्यक्ष मदत झाली.
बँक स्टॉल्स: रक्कम तपासण्यासाठी, खात्री करण्यासाठी आणि प्रक्रिया समजून घेण्यासाठी कार्यक्रम स्थळी विविध बँकांचे स्वतंत्र स्टॉल्स उभारण्यात आले होते.
माहिती: या स्टॉल्सच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या जुन्या किंवा निष्क्रिय खात्यांची त्वरित तपासणी, विमा पॉलिसी, मुदतठेवी, पीएफ किंवा इतर वित्तीय साधनांशी संबंधित माहिती आणि दाव्यासाठी आवश्यक कागदपत्रांचे मार्गदर्शन मिळाले.
यावेळी लाभार्थी ग्राहकांना ॲक्टिव्हेशन प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच, आर्थिक क्षेत्रातील दावे या विषयावर एका पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. बडोदा बँकेचे अग्रणी जिल्हा व्यवस्थापक कांतीलाल बाविस्कर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
राज्यभर शिबिरांचे आयोजन
निष्क्रिय मालमत्ता शोधण्यासाठी राज्यभरात शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरांमधून नागरिकांना निष्क्रिय खात्यांची माहिती, दाव्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन, तसेच संबंधित बँक अधिकाऱ्यांशी थेट संवादाची सुविधा उपलब्ध होईल. याशिवाय, ऑनलाइन पोर्टलद्वारे मालमत्तेची तपासणी करण्यास मदत उपलब्ध करून दिली जाईल.