
पावसाळ्यात सावध राहा! आर्द्र हवामानामुळे विषाणूजन्य आजारांचा धोका, चार आजारांतील वाढीची सरासरी ५७.६ टक्क्यांवर...
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, पावसाळ्यात वाढणाऱ्या प्रमुख संसर्गजन्य आजारांमध्ये चिंताजनक वाढ नोंदवली गेली आहे. मलेरियाच्या रुग्णसंख्येत १८.२ टक्के, डेंग्यूमध्ये २७.८ टक्के, लेप्टोस्पायरोसिसमध्ये १५.४ टक्के आणि एच१एन१च्या रुग्णसंख्येत तब्बल १६९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
जुनाट आजार असलेल्या व्यक्तींना धोका
सरकारी आणि खासगी रुग्णालयांच्या बाह्यरुग्ण विभागांमध्ये फ्लू, इन्फ्लुएंझा, विषाणूजन्य अतिसार तसेच दमा, अॅलर्जिक रायनायटिस आणि अॅलर्जिक ब्राँकायटिसच्या रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. वाढलेली आर्द्रता विषाणूच्या प्रसारासाठी पोषक ठरत असल्याने श्वसनमार्गातील संसर्ग वेगाने पसरत आहेत. त्याचबरोबर घरातील ओलावा, बुरशी, धूळकण, झुरळांचे कण आणि अपुरे वायुवीजन यांमुळे अॅलर्जीच्या तक्रारीमध्येही वाढ होत आहे, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, दमा, सीओपीडी किंवा इत्तर जुनाट आजार असलेल्या व्यक्तींना याचा अधिक धोका आहे.
शिवडी टीबी रुग्णालयातील माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र तातू ननावरे म्हटले की, “पावसाळ्यात वाढलेली आर्द्रता ही विषाणूजन्य संसर्ग आणि अॅलर्जीजन्य श्वसनविकार या दोन्हींसाठी पोषक वातावरण निर्माण करते. वारंवार होणारा खोकला, श्वास घेण्यास त्रास किंवा अॅलर्जीची लक्षणे याकडे दुर्लक्ष करू नये. घरातील ओलावा व बुरशीवर नियंत्रण, स्वच्छता, वेळेवर निदान आणि आवश्यक लसीकरण यांमुळे अनेक गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकतात”.
…तर वैद्यकीय सल्ला घ्या
पावसाळ्यात ताप, सतत खोकला, श्वास घेण्यास त्रास, अशक्तपणा, नाक वाहणे किंवा बंद होणे, डोळ्यांची खाज, छातीत घरघर, उलट्या होणे किया ऑक्सिजनची पातळी कमी होणे यांसारखी लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)