"महाराष्ट्रात हिंदुत्वाचे आणि लोकांचे…", मंगल प्रभात लोढा यांच्या प्रयत्नांना यश (फोटो सौजन्य-X)
80 वर्षे जुने हनुमानाचे मंदिर पाडण्यासाठी नोटीस बजावली होती. यावरून राजकारण चांगलेच तापले होते. अशातच हनुमान मंदिरात महाआरती करणार होते. मात्र त्याआधीच मंदिराला मिळालेल्या नोटीसीला रेल्वेकडून स्थगिती देण्यात आली आहे. यावेळी हनुमान मंदिराला आलेल्या नोटीसीची आमदार मंगल प्रभात लोढा यांनी माहिती दिली. लोढा यांनी रेल्वेमंत्र्याशीं फोनवरून संवाद साधत या नोटीस बाबत चर्चा केली होती.
मध्य रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले की, भाजप नेते आशिष शेलार आणि मंगल प्रभात लोढा यांच्या विनंतीवरून हनुमान मंदिराविरोधातील रेल्वे नोटीस स्थगित करण्यात आली आहे.आमदार मंगल प्रभात लोढा यांनी आज दादर पूर्व, मध्य रेल्वे प्लॅटफॉर्म क्र. १२ येथील स्थानकाला लागून असलेल्या हनुमान मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिर विश्वस्थांशी संवाद साधला आणि आरती केली. यावेळी आमदार कालिदास कोळंबकर, बजरंग दल आणि विश्वहिंदू परिषद चे कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते. या मंदिराचे निष्कासन होणार नसून या बाबत आपण स्वतः केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव जी यांच्याशी बोललो आहोत. या निर्णयाला थांबवण्याची ऑर्डर देखील माझ्याकडे आहे असे यावेळी मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.
मंगल प्रभात लोढा यांनी आमदार आशिष शेलार यांच्या समवेत मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा करून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे या कारवाईला स्थगिती देण्याची विनंती केली. त्यानुसार, कारवाई स्थगित करण्यात आली आहे. यावेळी पत्रकारांशी बोलतांना लोढा म्हणाले “केंद्र आणि महाराष्ट्रात हिंदुत्वाचे आणि लोकांचे ऐकणारे सरकार आहे. हिंदू समुदायाची या मंदिराबाबतची भावना आम्ही जाणतो त्यामुळे या पवित्र स्थानाला कोणताही धक्का लागणार नाही असे आश्वासन मी देतो. या मंदिराबाबत समजल्यापासून भारतीय जनता पक्षाचे नेते, बजरंग दलाचे आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आम्ही सर्वच केंद्रीय रेल्व मंत्री अश्विन वैष्णव यांच्या संपर्कात होतो. मंदिराचे रक्षण करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले या पुढे सुद्धा नेहमिच करु. धार्मिक आस्थेच्या विषयाचे राजकारण करण्याचा काहींचा मानस सफल होण्याआधीच आम्ही मंदिर वाचवण्यात यशस्वी झालो.”,अशी प्रतिक्रिया मंगल प्रभात लोढा यांनी दिली.
दादर परिसरात असलेल्या हनुमान मंदीराला रेल्वे प्रशासनाने नोटीस पाठवली. त्यानंतर हे हनुमान मंदीर अचानक चर्चेत आलं. हे मंदीर दादर रेल्वे स्टेशन परिसरातील हमालांनी बांधल्याचं सांगितलं जातं. या मंदीराला 80 वर्षाचा इतिहास असल्याचंही सांगण्यात येतं. आता याच मंदीरावरुन चांगलंच राजकारण तापलं आहे. हिंदूत्ववादी सरकार म्हणून भाजपनेच या मंदीराला नोटीस पाठविली म्हणत उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार टिका केली.