
Impact of changing weather on health: Increase in cough and cold patients Nanded News
Nanded News : सोनपेठ : रात्रीची थंडी आणि दिवसाची उष्णता जाणवत असल्यामुळे, बदलत्या हवामानाचा थेट परिणाम मानवी नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याने सोनपेठ शहरासह तालुक्यात सर्दी, खोकला, ताप आणि श्वसन विकाराच्या रुग्णांत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे शहरातील ग्रामीण रुग्णालयासह खाजगी दवाखान्यांमध्ये रुग्णांची वाढती गर्दी दिसून येत आहे. थंड-उष्ण वातावरणामुळे व बदलत्या ऋतूमुळे व्हायरल इन्फेक्शन आणि अॅलर्जी याबरोबरच सर्दी, खोकला, कफ व तापीच्या आजाराने डोके वर काढले आहे. त्यामुळे नागरिकांच्या घशाचे विकार वाढले आहेत.
त्यामध्ये लहान मुले व ज्येष्ठ नागरिक या आजारांची शिकार होताना जास्त प्रमाणात दिसून येत आहेत. सदर्दी, ताप व डोकेदुखी या आजाराने त्रस्त असणाऱ्या काही रुग्णांमध्ये डेंगू सदृश्य आजाराची लक्षणे दिसून येत आहेत. मात्र याबाबत आरोग्य विभागाने अद्याप पुष्टी केली नसल्याचे दिसून येते.
आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे
या आजारांपासून आराम मिळण्यासाठी तालुका आरोग्य विभागाने शहरासह ग्रामीण भागामध्ये घरोघरी जाऊन अशा स्वयंसेविकामार्फत आजारी रुग्णांचा सर्वे करून त्यांना औषध गोळ्या पुरविण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच पाण्यातून होणाऱ्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी व पिण्याचे जलस्त्रोत्रांमध्ये निर्जंतुकीकरणासाठी ग्रामपंचायतींनी आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.
हे देखील वाचा : “मुद्दामून त्या पक्षाचे नेते त्यांना स्वत:च…; NCP विलीनीकरणावर रोहित पवारांनी स्पष्टपणे मांडली भूमिका
योग्य ते उपचार करून घेण्याचे आवाहन
वातावरणातील बदलामुळे सर्दी खोकला आणि तापीसारखे आजार होत असतात. त्यासाठी नागरिकांनी खबरदारी म्हणून सरकारी दवाखाण्यासह नजिकचे उपकेंद्र व ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांकडे जाऊन वेळेत योग्य ते उपचार करुन घ्यावेत. तसेच सोनपेठ तालुक्यातील सर्वच गावांमधील आशा स्वयंसेविकां मार्फत आजारी रुग्णांचा शोध घेऊन त्यांना आजार मुक्त करण्यासाठी सोनपेठ तालुका आरोग्य विभाग तात्काळ योग्य त्या उपाययोजना करणार आहे.
हे देखील वाचा : ‘मामा’ पुन्हा येणार? आसाममध्ये लवकरच निवडणूक लागणार; BJP गेम करण्याच्या तयारीत; थेट 25 जणांचे…
माकडाचा चिमुकलीवर हल्ला
शंकरनगर-साईनगर परिसरात महिनोनमहिने सुरू असलेल्या माकडांच्या दहशतीकडे प्रशासनाने केलेले सातत्यपूर्ण दुर्लक्ष १५ फेब्रुवारी रोजी सकाळी सात वर्षांच्या चिमुकलीच्या जीवावर बेतण्याची वेळ आली. तेजस्वी इरन्ना गोरेकर या बालिकेवर सकाळी अचानक माकडाने हल्ला करून तिच्या हाताला गंभीर चावा घेतला. परिसरात माकडांचा उपद्रव वाढत असून नागरिकांच्या तक्रारींवरही नगरपरिषद आणि वनविभाग सातत्याने कानाडोळा करत असल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जात आहे. आजच्या घटनेने मात्र या निष्क्रयतेचे परिणाम किती भयावह ठरू शकतात, हे पुन्हा स्पष्ट झाले. अंगणात चावा खेळत असताना छतावरून खाली उतरलेल्या माकडाने चिमुकलीवर झडप घालून घेतला. मुलीच्या किंकाळ्यांनंतर घरच्यांनी आणि शेजाऱ्यांनी धाव घेऊन तिची सुटका केली. तेजस्वी गोरठेकर तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून पुढील उपचार सुरू आहेत.
माकडांना जंगलात सोडण्याची मागणी
दरम्यान, परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. नागरिकांची मागणी आहे की, माकडे पकडून सुरक्षित जंगलात सोडावीत, तसेच सातत्याने सुरक्षा उपाययोजना राबवून परिसराला उपद्रवी माकडांपासून मुक्त करावे. अन्यथा घडणाऱ्या घटनांची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर टाकली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. माकडांमुळे नागरिक त्रस्त झाले असून याकडे प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष होत आहे.