
Naigaon Nagar Panchayat shuts off water for four days due to water bill arrears Nanded News
Nanded News : नागेश कल्याण : नायगाव : मार्च महिना सुरू झाला असून होळी-धुळवड साजरी होत आहे, गुढीपाडवा उंबरठ्यावर येवून ठेपला असताना नायगाव शहरात पाण्याचा थेंबही नळातून पडत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सलग चौथ्या दिवशी पाणीपुरवठा ठप्प झाला असून जिगळा तळ्यावर सील ठोकताच शहराचा मुख्य पाणीस्त्रोत बंद पडला आणि प्रशासनाच्या कारभाराचा फटका थेट जनतेला बसला. (Nanded News)
नगरपंचायतीकडील सुमारे ३० लाख रुपयांच्या पाणीपट्टी थकबाकीमुळे ही कारवाई करण्यात आली. मात्र या निर्णयाचा परिणाम थेट नागरिकांवर झाला. सणासुदीच्या दिवसांत घरगुती कामे, धार्मिक विधी आणि पाहुणचारासाठी पाण्याची मोठी गरज असताना नागरिकांना विहिरी, बोअरवेल आणि खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.
३० लाख आमचे, १.८० कोटी नागरिकांचेः चव्हाण
नायगाव नगर पंचायतीचे उपनगराध्यक्ष विजय चव्हाण यांनी दैनिक नवराष्ट्रशी बोलताना प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली, नगरपंचायतीकडे ३० लाख रुपयांची थकबाकी आहे; मात्र शहरवासीयांकडूनच तब्बल १ कोटी ८० लाख रुपयांची पाणीपट्टी बाकी आहे. कर वसुलीसाठी आम्ही सक्ती करत नाही. सुविधा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ३० लाखांची थकबाकी ही ग्रामपंचायत काळापासून प्रलंबित आहे, असे त्यांनी सांगितले. नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागू नये, म्हणून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. एक-दोन दिवसांत परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी हालचाली सुरू आहेत, असा दावा त्यांनी केला. नगर प्रशासनाची बदनामी करण्यासाठी विरोधक मुद्दाम वातावरण तापवत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
हे देखील वाचा : अजित पवारांच्या अपघाताला नवे वळण! घटनेपूर्वी बारामती विमान तळाची रेकी? आमदार रोहित पवार यांचा धक्कादायक दावा
विरोधकांनी उठवली टीकेची झोड
या पाणीप्रश्नावरून सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधकांकडून सोशल मीडियावर आरोपांचे ‘वॉर’ सुरू झाले आहेत.
एकीकडे नगर प्रशासनाच्या निर्षक्रयता, आर्थिक गैरव्यवस्थापन आणि राजकीय हेतुपुरस्सर बदनामीचे आरोप जोरदारपणे होत आहेत तर दुसरीकडे नायगावकरांचे नळ मात्र कोरडेच आहेत. याची चिंता नागरिक करत आहेत.
काही भागांत टैंकर दरात मनमानी वाढ झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. “आर्थिक गोंधळाची शिक्षा आम्ही का भोगायची?” असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
हे देखील वाचा : विनोद तावडेंना मिळालं प्रामाणिक पणाचं गिफ्ट! राज्यसभेवर संधी मिळताच व्यक्त केल्या भावना
पाळज येथे डिजिटल रूम फोडली; जिल्हा परिषदच्या हायस्कूलमध्ये चोरी
नांदेड (वा.) भोकर तालुक्यातील पाळज येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये अज्ञात चोरट्याने डिजिटल रूमचे कुलूप तोडून सोलार यूपीएस इन्व्हर्टर व बॅटरी असा सुमारे ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याची घटना घडली आहे. ही घटना २६ फेब्रुवारी रोजी पहाटे घडली.
चोरट्याने शाळेतील डिजिटल रूमच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व तेथील लिव्हगार्ड कंपनीचा सोलार यूपीएस इन्व्हर्टर व बॅटरी चोरी करून नेली. याप्रकरणी जि.प. हायस्कूल पाळज येथील मुख्याध्यापक प्रशांत विलासराव पत्तेवाट (वय ५५ वर्षे) यांनी भोकर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञाता आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल लक्षटवास हे करीत आहेत.