
सिंहस्थ कुंभमेळ्यात दररोज मिळणार 940 दशलक्ष लिटर पाणी; साधूग्राममध्ये दहा लाख साधू-महंत राहणार?
नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी किती लाख भाविक येणार यापेक्षा आलेल्या प्रत्येक भाविकाला रामकुंडापर्यंत पोहचवून अमृतस्नानानंतर तेथून पुन्हा साधुग्राम अथवा त्यांच्या इच्छित स्थळी सुरक्षीत पाठवणे महत्वाचे आहे. यासाठी आम्ही आधुनिक तंत्रज्ञनाचा शक्य तितका वापर करीत असल्याचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्पष्ट केले.
‘दैनिक नवराष्ट्र’ तसेच ‘दैनिक नवभारत’च्या कार्यालयात सिंहस्थ कामांबाबत माहिती देताना कर्णिक म्हणाले की, पोलिस प्रशासनाच्यादृष्टीने सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन प्रशासकीय, बंदोबस्त आणि वाहतूक अशा प्रमुख वेगवेगळ्या स्थरावर सुरू आहे. जवळपास ३३ हजारापेक्षा अधिक पोलिस बंदोबस्तासाठी राहतील. या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या राहण्याचा, त्यांच्या जेवणाचा, आजारपणाचा प्रश्नही सोडवण्यात येतो आहे. जलद प्रतिसाद युनिट (क्युआरटी) शहरातील सर्व घाटांसह इतर प्रमुख ठिकाणांवर प्रत्यक्ष पोहचून तेथील व्हिडीओज, फोटोज काढून नकाशे तयार करीत आहेत. त्यात स्नायपरचे ठिकाण कोणते असावे, आपत्तकालीन परिस्थितीत क्युआरटी कोणत्या मार्गाने घटनास्थळी पोहचू शकते, कमांड सेंटर कुठे असेल अशी अनेक प्रकारची प्रशासकीय कामे सध्या सुरू आहेत. अशी कामे करताना ३६० कॅमेरे फायद्याचे ठरतात. त्याचा वापर आम्ही करतो.
सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान पोलिसांच्या मदतीला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांना २ क्रेडीट पॉईट विद्यापीठामार्फत मिळणार आहे. आपल्याकडे महाविद्यालयाची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्या त्या भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्याच परिसरात शिक्षक व पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनाच्या कामात सहभागी करून घेणार आहोत. युवकांमध्ये प्रचंड ऊर्जा असते. तसेच त्यांना या निमित्ताने पोलिसांच्या कामाचा अनुभव सुद्धा मिळेल, देश परदेशातून आलेल्या तसेच नाशिककर भाविकांनाही रामकुंडावर स्न्नानासाठी यायचे आहे. अशावेळी गर्दीचे योग्य नियोजन काटेकोर होणे महत्वाचे आहे. सर्वांनाच रामकुंडावर स्नान करायचे आहे. मात्र, तेथे पोहचताना त्यांना शहराबाहेरील पार्किंग, तेथून शहरा अंतर्गत पार्किंग व पुढे पायी प्रवास करावा लागणार आहे. या दरम्यान एकही भाविक सीसीटीव्हींच्या कक्षेबाहेर राहणार नाही, याची काळजी आम्ही घेतली असल्याचे पोलिस आयुक्त कर्णिक यांनी स्पष्ट केले.
सिंहस्थ कुंभमेळ्या लाखो भाविक येणार आहेत. त्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी तसेच दहशतवादीही सहज मिसळू शकतात. त्यामुळे आम्ही आधुनिक तंत्रज्ञान असलेले सीसीटीव्ही ठिकठिकाणी बसवणार आहोत. या तंत्रज्ञानाच्या मदतीने चेहरा ओळखण्याचे काम सोपे होते. या पार्श्वभूमीवर पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातत्याने एआयचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने, राज्य व केंद्र सरकारच्या पुढाकाराने तसेच लोकसहभागातून २०२७ चा कुंभमेळा विक्रमी आणि यशस्वी करू, असा विश्वास पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी व्यक्त केला.
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित शहरात प्रचंड पायाभूत सुविधांची कामे सुरू आहे. जवळपास ३० रस्त्यांची कामे पूर्णत्वास जातील. समृद्धी महामार्ग सुरू झाला असून, लवकरच शहरचा सर्वात प्रमुख असलेला बाहारिंग रोड सुद्धा तयार होईल. यामुळे आपल्याला वाढवण बंदर जवळ येईल. रेल्वे, महामार्गाच्या कक्षा रूदावत असताना या कामांना थोडासा वेळ लागणार आहे. जवळपास एक वर्षाच्या कालावधीनंतर नाशिकचे बदललेलं रूय आपल्याला अनुभवता येईल. रस्ते, रेल्वे, जलमार्ग अशा दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध झाल्यानंतर नाशिकचा विकास खूप जलद गतीने होईल, असा विश्वास पोलिस आयुक्त कर्णिक यांनी व्यक्त केला.