
Nashik news,
गेल्या काही वर्षांत सटाणा शहराचा झपाट्याने विस्तार झाला आहे. नव्या वसाहती, व्यापारी संकुले, दवाखाने, बँका आणि शैक्षणिक संस्था वाढल्या आहेत. मात्र रस्त्यांची रुंदी आणि संख्या मात्र वाढलेली नाही. परिणामी मुख्य रस्ते, महामार्ग तसेच अंतर्गत गल्ल्यांमध्ये दिवसेंदिवस वाहतुकीची मोठी गर्दी होताना दिसत आहे. अनेकदा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहने अडकून राहतात. वाहतूक कोंडीमुळे बऱ्याच इतर समस्यांनाही तोंड द्यावं लागतं. नागरिकांना बराच वेळ थांबूनच आपली वाहने पुढे न्यावी लागत आहेत. त्यामुळे या भागात स्थानिकांमध्ये चांगलीच निराशा दिसत आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न आजही जशाच तसा आहे.
काही नागरिक खरेदीसाठी, दवाखान्यात जाण्यासाठी किंवा बँकेच्या कामासाठी येताना दुचाकी व चारचाकी वाहने आणतात. ही वाहनं थेट रस्त्यावरच उभी करून दुकानात निघून जातात. त्यामुळे अरुंद गल्ल्यांमध्ये पूर्णपणे वाहतूक ठप्प होते. या परिस्थितीत वाहनचालकांना कर्कश हॉर्न वाजवून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा लागतो. परिणामी ध्वनीप्रदूषणातही वाढ होत असून नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
नगर परिषदेने अतिक्रमण हटवून रस्ते आणि गटारे मोकळी केली असली तरी वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी आता नागरिकांवरच आहे. शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनसंख्या लक्षात घेता नियोजनबद्ध पार्किंग व्यवस्था, ‘नो पार्किंग’ क्षेत्रांची स्पष्ट चिन्हे आणि वाहतूक जनजागृती मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अतिक्रमण हटविल्यानंतर रस्ते मोकळे झाले असले तरी बेशिस्त पार्किंगवर नियंत्रण मिळविल्याशिवाय सटाण्यातील वाहतूक कोंडीची समस्या सुटणार नाही.