
ग्रामीण भागातील हॉटेलवर पेटल्या चूली; गॅस मिळत नसल्याने व्यावसायिकांचे हाल, रोजगाराचा प्रश्न
गॅस उपलब्ध नसल्याने दररोज तयार होणारे सुमारे २०० पदार्थांचे मेनू आता केवळ ५० ते ६० पदार्थावर आले आहेत. विशेषतः साठच इंडियन आणि चायनीज पदार्थ पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे.
गॅस टंचाईचा फायदा घेत लाकूड आणि कोळसा विक्रेत्यांनी दर वाढवले आहेत. पूर्वी ८० ते ८५ रुपये किलो असलेला कोळसा आता १०० ते १०५ रुपयांवर पोहोचला आहे. उत्पादन खर्च वाढल्याने हॉटेल व्यावसायिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. कर्मचाऱ्यांच्या जेवणातही कपात करून साध्या पद्धतीचे जेवण दिले जात आहे.
इगतपुरी तालुका पर्यटनावर अवलंबून असल्याने या संकटामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला खिळ बसण्याची शक्यता आहे. शनिवार आणि रविवारी पर्यटकांची मोठी गर्दी असते. पूर्वी केवळ ‘चुलीवरचे मटण’ हौसेने खाल्ले जायचे, मात्र आता चहापासून सर्वच खाद्यपदार्थ नाईलाजास्तव चुलीवर करावे लागत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.
गॅस सिलिंडर मिळत नसल्याने हटिल व्यावसायिकांनी आता पारंपरिक पद्धतींचा अवलंब सुरू केला आहे. अनेक ठिकाणी चपाती बंद करून चुलीवरची भाकरी आणि रोट्या देण्यास सुरुवात झाली आहे. जास्त वेळ आणि इंधन लागणारे ‘नॉन-व्हेज’ पदार्थ (विशेषतः मटण) मेनूतून वगळण्यात आले आहेत. काही पदार्थ तयार करण्यासाठी इंडक्शन शेगडीचा वापर वाढवण्यात आला आहे.
दरम्यान, मध्य पूर्वेतील संकट, देशांतर्गत साठा कमी झाल्यामुळे आणि आयातीत घट झाल्यामुळे, सरकारी तेल कंपन्या मर्यादित एलपीजीची बचत करण्याची तयारी करत आहेत. या कंपन्या आता १४.२ किलोग्रॅमच्या सिलिंडरमधून घरांना केवळ १० किलोग्रॅम एलपीजी पुरवठा करण्याची योजना आखत आहेत. हा प्रस्ताव सध्या विचाराधीन आहे. शक्य तितक्या जास्त घरांना एलपीजीचा पुरवठा कायम ठेवत त्याची बचत करणे, हा यामागील उद्देश असल्याचे मानले जाते.