
करंजी घाटातील धोकादायक रस्त्याची दखल; 'नवराष्ट्र'च्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाची तातडीची कारवाई
पोपट पिटेकर, अहिल्यानगर: कल्याण-विशाखापट्टणम या महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गावरील करंजी घाटातील धोकादायक रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला अखेर प्रशासनाने सुरुवात केली आहे. या प्रश्नावर ‘नवराष्ट्र’ने सातत्याने वृत्तांकन करत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या पाठपुराव्याची दखल घेत प्रशासनाने तातडीने हालचाल करत रस्ता दुरुस्ती आणि संरक्षक भिंतीच्या उभारणीचे काम सुरू केले आहे.
गेल्या वर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे करंजी घाटात मोठी दरड कोसळली होती. या दुर्घटनेत महामार्गाचा जवळपास अर्धा भाग खचल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. अरुंद झालेल्या रस्त्यामुळे दररोज वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या. विशेषतः पावसाळ्यात हा मार्ग अधिक धोकादायक बनल्याने मोठा अपघात होण्याची भीती वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात होती.
या गंभीर प्रश्नाची दखल घेत स्थानिक आमदार मोनिका राजळे यांनी राज्याच्या नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात हा विषय सभागृहात उपस्थित केला होता. रस्ता दुरुस्तीचे काम रखडल्याबद्दल त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी सरकारकडे केली होती. दरम्यान, ‘नवराष्ट्र’ने करंजी घाटातील धोकादायक परिस्थिती, नागरिकांच्या हालअपेष्टा आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न सातत्याने लावून धरला. या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रशासनाने प्रत्यक्ष घटनास्थळी काम सुरू करत रस्ता दुरुस्तीबरोबरच संरक्षक भिंतीचे बांधकामही हाती घेतले आहे. कामाला सुरुवात झाल्यामुळे या मार्गावरून दररोज प्रवास करणारे वाहनधारक, व्यावसायिक तसेच स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, हे काम लवकरात लवकर पूर्ण करून करंजी घाटातील वाहतूक पूर्णपणे सुरक्षित करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग हा महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांना जोडणारा महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग आहे. पूर्वी हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 (NH-222) म्हणून ओळखला जात होता. राष्ट्रीय महामार्गांच्या पुनर्क्रमांकनानंतर या मार्गाला राष्ट्रीय महामार्ग 61 (NH-61) असे नाव देण्यात आले.
मुंबई महानगर परिसर आणि मराठवाडा यांच्यातील महत्त्वाचा दळणवळण मार्ग.
शेतीमाल, साखर, कापूस, धान्य, फळे आणि औद्योगिक मालवाहतुकीसाठी अत्यंत उपयोगी.
महाराष्ट्रातून तेलंगणा आणि आंध्र प्रदेशकडे जाणाऱ्या मालवाहतुकीचा प्रमुख कॉरिडॉर.
अनेक धार्मिक आणि पर्यटनस्थळांना जोडणारा मार्ग असल्याने वर्षभर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते.
Karanji Ghat हा या महामार्गावरील संवेदनशील घाट विभाग आहे. मुसळधार पावसामुळे येथे दरडी कोसळणे, रस्ता खचणे आणि वाहतूक कोंडीच्या घटना वारंवार घडतात. त्यामुळे या भागात संरक्षक भिंती, उतार स्थिरीकरण (Slope Protection), पावसाच्या पाण्याचा निचरा आणि नियमित रस्ता दुरुस्तीची आवश्यकता असते.