नवराष्ट्रचा दणका! ‘तहानलेल्या गावा’ला दिलासा! कोळथरे ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठ्यासाठी नियोजन सुरू
गेल्या काही दिवसांपासून कोळथरे गावातील तेली वाडी, गुरव वाडी, भुवड वाडी, बोथरे वाडी आणि जोशी वाडीसह अनेक भागांतील नागरिक ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेवर पूर्णपणे अवलंबून आहेत. मात्र, प्रत्यक्षात पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर होता. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पाणी सोडणारे कर्मचारी, पाईपलाईन गळती दुरुस्त करणारे कर्मचारी आणि ग्रामपंचायत प्रशासन यांच्यात योग्य समन्वय नसल्याने समस्या अधिक गंभीर बनली आहे. गावाजवळील धरणात पुरेसे पाणी उपलब्ध असतानाही अनेक वाड्यांमध्ये नियमित पाणी पोहोचत नव्हते. विशेष म्हणजे, पाईपलाईन फुटल्यानंतर तिची दुरुस्ती 15 ते 20 दिवसांपर्यंत केली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. परिणामी, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत होता. या समस्येमुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न सुटत नसल्याने हा मुद्दा ऐरणीवर आला होता.
या पार्श्वभूमीवर ‘नवराष्ट्र डिजीटल ’ने गावातील पाणीटंचाईची वस्तुस्थिती समोर आणणारे वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर कोळथरे ग्रामपंचायतीने तातडीने बैठक घेत परिस्थितीचा आढावा घेतल्याचे सांगितले जात आहे. गावात नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी टँकरची व्यवस्था, जलस्रोतांची पाहणी, पाईपलाईन दुरुस्ती आणि पर्यायी उपाययोजनांवर काम सुरू करण्यात येत आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाने नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवल्या जातील, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत गावातील पाणीप्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्थानिकांनीही या निर्णयाचे स्वागत करत लवकरात लवकर प्रत्यक्ष अंमलबजावणीची मागणी केली आहे.
‘या’ मंदिरात आहे साक्षात श्रीगणेशाचे पाऊल! इच्छापूर्ती करणारे कोकणातील प्रसिद्ध देवस्थान






