नवराष्ट्रच्या बातमीचा धसका! चोरीला गेलेले कारचे तीन टायर अवघ्या २४ तासांत पुन्हा जागेवर
एमएच-०५-ईएल-००५५ क्रमांकाची आर्टिका कार सोमवारी रात्री पार्क करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी पहाटे विमानतळावरील बुकिंगसाठी वाहन घेण्यास गेलेल्या मालकाला कारचे तीन टायर गायब असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांचे बुकिंग रद्द झाले आणि आर्थिक फटकाही बसला. घटनेनंतर कोपरखैरणे पोलिसांनी एमसी नोंद करून तपास सुरू केला. त्यानंतर ‘नवराष्ट्र’ने “नवी मुंबईत चोरीच्या घटनांचा धुमाकूळ; आता चारचाकींचे टायर-रिंगही चोरट्यांच्या निशाण्यावर” या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले. बातमीची चर्चा सुरू झाली आणि पोलिसांनी सीसीटीव्ही तपासाला वेग दिला.
मंगळवारी रात्री मात्र वाहनमालकाला वाशी वरून घरी आल्यानंतर गाडी जवळ बघितले आणि त्यांना धक्काच बसला. चोरीला गेलेले तीनही टायर आणि अलॉय रिंग पुन्हा कारला व्यवस्थित बसवलेले होते. त्यामुळे परिसरात आता एकच चर्चा सुरू आहे, हा चोर होता की ‘सर्व्हिस सेंटरचा नाईट शिफ्ट कर्मचारी’? चोरी करून २४ तासांत माल परत बसवणारा असा ‘प्रामाणिक’ चोर नवी मुंबईत पहिल्यांदाच पाहायला मिळाला, अशी मिश्कील प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.
मात्र या प्रकाराकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. चोरी करून नंतर पुरावे नष्ट करण्यासाठी किंवा पोलिसांच्या कारवाईची भीती वाटल्याने माल परत ठेवण्यात आला का? की यामागे इतर कोणता हेतू होता? याचा उलगडा होणे आवश्यक आहे. सध्या कोपरखैरणे पोलिस सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि इतर सर्व शक्यतांची पडताळणी करत आहेत. टायर परत मिळाले असले तरी चोरी करणारा कोण, त्याचा उद्देश काय आणि कायद्याचा धाक निर्माण झाला का, याचे उत्तर मिळणे तितकेच महत्त्वाचे आहे. नवराष्ट्रच्या बातमीचा हा इम्पॅक्ट मानायचा की पोलिसांच्या तपासाची भीती, याचा निर्णय तपासानंतर होईल; मात्र इतके नक्की, की या घटनेने चोरट्यांनाही बातम्यांची दखल घ्यावी लागते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.






