
जागांबाबत मित्रपक्षांशी चर्चा करा, सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीत तर...; हसन मुश्रीफांचे कर्यकर्त्यांना आवाहन
महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवन येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचा मेळावा झाला. प्रास्ताविकात राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे यांनी महानगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. त्यासाठी आम्हाला मुश्रीफ यांनी हिमालयाची ताकद द्यावी, असे आवाहन केले.
कामगारांना १० हजारात घरकुल
मंत्री मुश्रीफ म्हणाले, इचलकरंजी कामगारांचे शहर असून, त्यांच्या श्रमाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. शहराला भेडसावणारा पाणी प्रश्न संपविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कागलच्या धर्तीवर इचलकरंजीतील कामगारांना १० हजारात स्वप्नातील घरकुल देण्याचा आमचा प्रयत्न राहिल. तर लाडक्या बहिणींचे १५०० रुपयाचे असलेले अनुदान २१०० करतानाच संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ होण्यासाठी अडचणीच्या ठरत असलेल्या तांत्रिक बाबी लवकरच दूर होतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
पक्षाची ताकद कमी झाली हा भ्रम
यापूर्वी नगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीने घवघवीत यश संपादन करतानाच माजी आमदार अशोक जांभळे यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत जाण्याची किमयाही केली आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीतही यश निश्चित मिळेल. काहीजण पक्षातून गेले म्हणून पक्षाची ताकद कमी झाली, अशा भ्रमात असतील तर ते चुकीचे ठरेल.