
वाई : शहरातील गणपती मंदिर पुल परिसरातील पथदिवे बसवण्याचे काम निवडणूक काळात सुरू करून नंतर अचानक थांबवण्यात आल्याने वाईकर नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. तब्बल तीन महिन्यांपासून हे काम अर्धवट अवस्थेत पडून असून ठेकेदार बेपत्ता झाल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. मात्र याबाबत नगरपालिका प्रशासन, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक यांची भूमिका संशयास्पद शांततेची असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
निवडणुका संपताच कामाला ब्रेक लागल्याने हे काम केवळ राजकीय दिखाव्यासाठीच सुरू करण्यात आले होते का, असा सवाल उपस्थित होत आहे. “ठेकेदार नेमका कुठे आहे? आणि प्रशासन त्याच्यावर कारवाई का करत नाही?” असा थेट प्रश्न नागरिक विचारत आहेत.
दरम्यान, उभारण्यात आलेल्या पथदिव्यांच्या खांबांसाठी केलेल्या बांधकामाच्या दर्जाबाबतही गंभीर शंका उपस्थित करण्यात येत आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे भविष्यात अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त होत असून संपूर्ण कामाची तांत्रिक चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
या प्रकरणात विरोधी पक्षानेही अपेक्षित भूमिका घेतलेली नसल्याचे चित्र दिसत आहे. नवनियुक्त विरोधी पक्ष नेतेही मौन बाळगत असल्याने “विरोधक नेमके कधी बोलणार?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
Satara News : रस्ते कामातील दिरंगाईवर वाईत नागरिकांचा संताप; नगरपरिषद सभेत प्रशासनाला जाब
याचबरोबर कृष्णा नदीपात्रातील दगड बसवण्याचे कामही अर्धवटच ठेवण्यात आले आहे. एसटीपी लाईनसाठी काढण्यात आलेले दगड पुन्हा न बसवल्याने शासनाचा खर्च वाया गेल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. पावसाळा तोंडावर असताना हे दगड प्रवाहात वाहून जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि संबंधित नगरसेवकांनी या गंभीर विषयावर अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विकासकामांचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र समोर येत आहे.
वाईकरांचा थेट सवाल :
अर्धवट कामे का थांबवली?
ठेकेदार कुठे गायब झाला?
आणि ही कामे पूर्ण नेमकी कधी होणार?
प्रशासनाने तातडीने यावर स्पष्टीकरण देऊन अर्धवट कामे पूर्ण करावीत, अन्यथा जनतेचा संताप अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Wai Nagarparishad Budget: वाई नगरपरिषदेचा ९२ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर; शहर विकासासह पर्यटनावर भर