
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
राज्यातील महापालिकांनी गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डेमुक्त करण्याचे निर्देश दिल्यानंतर या कामाला अधिक गती मिळाली आहे.
मुसळधार पावसामुळे वसई-विरारमधील अनेक मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. नालासोपारा पूर्वेकडील आचोळे रोडची अवस्था याचे ठळक उदाहरण ठरत आहे. नालासोपारा रेल्वे स्थानक, वसई आणि मुंबई अहमदाबाद महामार्गाला जोडणाऱ्या या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते.
खड्डे बुजवण्यासाठी करण्यात आलेली तात्पुरती डागडुजी पावसात वाहून गेल्याने रस्त्यावर खडी आणि मटेरियल पसरले आहे. त्यामुळे विशेषतः दुचाकीस्वारांसाठी अपघाताचा धोका वाढला आहे. धानिवबाग, संतोष भुवन, वाकणपाडा, श्रीप्रस्थ रोड, नायगाव-बापाणे, कण्हेर चौकी, बरफपाडा, कोपरी, अग्रवाल, भोयदापाडा, वालीव, एव्हरशाईन अंबाडी, नायगाव-टिवरी तसेच वसई-अर्नाळा भुईगाव मार्गावरही खड्यांचे प्रमाण मोठे आहे. खड्यांमुळे वाहनांचे नुकसान, वाहतुकीचा वेग मंदावणे आणि अपघातांचा धोका वाढला आहे.
मागील दीड वर्षात रस्ते दुरुस्ती व मजबुतीकरणासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला असतानाही पावसाळा सुरू होताच पुन्हा खड्डे पडल्याने नागरिकांकडून प्रश्न उपस्थित होत आहेत. मुसळधार पाऊस आणि अनेक दिवस साचलेल्या पाण्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, केवळ दरवर्षी डागडुजी करण्याऐवजी शहरासाठी दीर्घकालीन आणि दर्जेदार रस्ता आराखडा तयार करण्याची मागणी केली जात आहे.
महापालिकेने रस्त्यांच्या स्थितीनुसार काँक्रिटीकरण, पेव्हर ब्लॉक, मास्टिक आणि खडीच्या माध्यमातून खड्डे बुजवण्याचे नियोजन केले आहे. यापूर्वी ज्या ठेकेदारांनी रस्त्यांची कामे केली होती, त्यांच्या कामाच्या ठिकाणी पुन्हा दुरवस्था आढळल्यास त्याच ठेकेदारांकडून दुरुस्ती करून घेतली जाणार असल्याचे प्रभारी शहर अभियंता प्रदीप पाचंगे यांनी सांगितले.