
टॉर्चच्या प्रकाशात रुग्णांवर उपचार! डॉक्टरांची कमतरता; भामरागड रुग्णालयात आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा
भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा पुन्हा एकदा समोर आला. रुग्णालयातील वीजपुरवठा खंडित होताच डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना टॉर्चच्या प्रकाशात रुग्णांवर उपचार करावे लागत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले. पर्यायी वीज व्यवस्थेचा अभाव, डॉक्टरांची कमतरता आणि अपुऱ्या सुविधांमुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.(फोटो सौजन्य – AI)
नागपुरात भिंत कोसळून मोठी दुर्घटना; दोन जण जखमी, जीर्ण भिंतींचा धोका कायम
तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न अनेक वर्षांपासून ऐरणीवर आहे. खाटेवरून रुग्णांची वाहतूक, पायी रुग्णांना रुग्णालयात नेण्याच्या घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. हा विषय विधानसभेतही गाजला होता. राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी स्वतः ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन येथील व्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली होती. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झाली नाही. सध्या ग्रामीण रुग्णालयात एकही कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी कार्यरत नसून उसनवारीवर नियुक्त करण्यात आलेल्या दोन डॉक्टरांच्या भरवशावर आरोग्यसेवा सुरू आहे. वैद्यकीय अधीक्षकांबाबत प्रशासकीय कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याने रुग्णालयाचा कारभार विस्कळीत झाल्याची चर्चा आहे.
पावसाळ्यात सर्पदंशासारख घटनांचा धोका वाढलेला असताना रुग्णालयातील ही अवस्था गंभीर चिंता निर्माण करणारी आहे. ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणामुळे यापूर्वी अनेकांना जीव गमवावा लागल्याचा आरोप नागरिकांनी केला. त्यामुळे भामरागडसारख्या अतिदुर्गम आणि अतिसंवेदनशील तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात तातडीने कायमस्वरूपी डॉक्टरांची नियुक्ती, पर्यायी व्यवस्था आणि आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत आहे. रुग्णांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ अखेर कधी थांबणार? असा संतप्त सवालही उपस्थित होत आहे.
Wardha : २.४९ लाख पशुधनाला लस; घटसर्प, एकटांग्या, आंत्रविकारावर उपचार; पशुसंवर्धन विभागाची मोहीम
भामरागड तालुका मलेरियाग्रस्त (एन्डेमिक) क्षेत्रात मोडत असून पावसाळ्यामुळे रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली. सध्या आंतररुग्ण विभागात २७ रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र, वीजपुरवठा खंडित होताच पर्यायी वीज व्यवस्था नसल्याने संपूर्ण रुग्णालय अंधारात बुडते. अशा परिस्थितीत डॉक्टरांना टॉर्चच्या साहाय्याने उपचार करावे लागत असल्याने रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अंधारामुळे रुग्णांना शौचालयात जाणे, रात्री हालचाल करणे तसेच आपत्कालीन परिस्थिती हाताळणेही कठीण बनत आहे.