
Pune Water Supply News: एका आठवड्यात दुसऱ्यांना महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाणी कपातीच्या विषयावर तापले. वातावरण नगरसेवकांनी तक्रारी केल्या त्याचवेळी पाणी गळती आणि पाण्याची नासाडी रोखण्यात महापालिका कमी पडत असल्याची कबुली महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.
गेल्या सोमवारपासून शहरात पाणी कपात सुरु आहे. एक दिवसाआड होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. या प्रश्नांचा पाढाच नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत वाचला. कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, काही भागांत पाणीच न पोहोचणे, टँकरसाठी होणारी धावपळ, टँकरचा कथित काळाबाजार, दूषित पाणीपुरवठा आणि नियोजनाचा अभाव आणि पाणीकपातीचा निर्णय घेताना पुरेशी पूर्वतयारी झाली नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला.
स्वप्नील दुधाने यांनी, ९० टक्के अडचणी मानवनिर्मित आहेत. प्रत्येक वेळी निसर्गाला जबाबदार धरून चालणार नाही, अशी टीका केली. वेळापत्रक जाहीर करूनही प्रत्यक्षात अनेक भागांत कमी वेळ पाणी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. टँकर व्यवस्थेवरही नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केले. हरिदास चरवड यांनी टँकरवर क्रमांक टाकण्याची मागणी केली, तर गफूर पठाण यांनी पैसे देऊनही नागरिकांना टँकर मिळत नसल्याचा आरोप केला. उमेश गायकवाड यांनी कोरेगाव पार्क, मुंढवा आणि मगरपट्टा भागात जास्त पैसे देऊनही टँकर मिळत नसल्याचे सांगितले.
टँकरचे नियोजन वॉर्डनिहाय करण्याची मागणी बाबुराव चांदेरे यांनी केली. वैशाली बनकर यांनी काही भागांत दूषित पाणी येत असल्याची तक्रार केली. मानसी देशपांडे यांनी सोसायट्यांमध्ये केवळ १५ ते ३० मिनिटे पाणी येत असल्याचे सांगत रात्री उशिरापर्यंत नागरिकांचे फोन येत असल्याचे नमूद केले. वाघोली, धायरी, कात्रज-आंबेगाव, औंध-बोपोडी आणि हडपसर भागातील पाणीप्रश्न गंभीर असल्याचे सभागृहात सांगण्यात आले.
पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी शहराला १६२७ एमएलडी पाण्याची गरज असून सध्या ११५० ते १२०० एमएलडी पाणीपुरवठा होत असल्याचे सांगितले. टँकरची मागणी वाढल्याने दररोजच्या फेऱ्या १४०० वरून १७०० ते १७५० पर्यंत वाढवल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे गटनेते नितीन गावडे यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. वारंवार सूचना देऊनही अनेक भागांतील समस्या कायम आहेत. अचानक पाणीपुरवठ्याच्या वेळेत बदल केला जातो, मात्र नगरसेवकांना किंवा नागरिकांना माहिती दिली जात नाही. त्यामुळे नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागते.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे गटनेते काका चव्हाण म्हणाले, धायरीसह समाविष्ट गावांमध्ये आधीपासूनच दिवसाआड पाणीपुरवठा होत असून बोअरवेल आटल्याने टँकर पॉईंट वाढवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते अॅड. निलेश निकम यांनी एकदिवसाआड पाणीपुरवठ्याचा प्रयोग अपयशी ठरत असून अनेक भागांत जलवाहिन्या कोरड्या पडतात आणि दुसऱ्या दिवशीही पाणी मिळत नाही. कालव्यांतून जाणारे पाणी आणि पाणीबचतीचा हिशेब प्रशासनाने स्पष्ट करावा, अशी मागणी त्यांनी केली.
आयुक्त नवल किशोर राम यांनी पाणीसंकटाचे गांभीर्य मान्य करताना, दीर्घकालीन नियोजनाची गरज असल्याचे सांगितले. पाणीगळती आणि पाण्याची नासाडी रोखण्यात महापालिका कमी पडली आहे, अशी कबुली त्यांनी दिली. पाणीपुरवठा योजना गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्ण असल्याचेही त्यांनी नमूद केले. एकदिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय टाळता आला नसल्याचे सांगत, भविष्यातील संकट लक्षात घेऊन काटेकोर नियोजन सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महापौर मंजुषा नागपुरे यांनी दूषित पाणीपुरवठा आणि लोकप्रतिनिधींना प्रतिसाद न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करताना नगरसेवकांशी चर्चा करावी, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.