पुणे : पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे, पुण्यात दररोज गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत आहेत. यामुळे नागरिकांसोबतचं पोलिसही हैराण झाले आहेत. अशातच आता स्मशानभूमीतील चितेजवळ सापडलेल्या लाकडावरील रक्ताच्या डागावरुन पुणे ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गु्न्हा उघडकीस आणला आहे. इंदापूरमधील मौजे तावशी गावात ही घटना घडली. ज्येष्ठ नागरिकाच्या खून प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली असून, कोणतेही धागेदोरे हाती नसताना पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करुन या खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावला आहे.
हरिभाऊ धुराजी जगताप (वय ७४ रा. गंगाखेड, जि. परभणी) असे खून झालेल्यांचे नाव आहे. याप्रकरणी दादासाहेब मारुती हरिहर (वय ३० रा. गोखळी, ता. फलटण, जि. सातारा) आणि त्याचा मित्र विशाल सदाशिव खिलारे (वय २३ , रा. गोखळी, ता. फलटण, जि. सातारा ) यांना अटक करण्यात आली आहे.
वालचंदनगर परिसरात तावशी गावातील स्मशानभुमीत एक मृतदेह जळत आहे. पण, चितेजवळ पडलेल्या लाकडावर मोठ्या प्रमाणात रक्ताचे डाग पडले आहेत, अशी माहिती पोलीस पाटलांनी १६ नोव्हेंबर रोजी पोलिसांना दिली. नंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जाळीवर पुर्णपणे जळालेली हाडे, तसेच काही अंतरावर रक्त सांडलेले दिसत होते. चितेजवळ पडलेल्या लाकडावरही रक्ताचे डाग दिसत होते. सरणावर फक्त काही हाडे उरली होती. यामुळे नेमका प्रकार लक्षात येत नव्हता. मात्र, रक्ताचे डाग ताजे असल्याने हा खूनाचा प्रकार असू शकतो, असा संशय पोलिसांना होता. हे प्रकरण गुंतागुंतीचे असल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथकही तपासात सहभागी झाले होते. दोन्ही पथकांनी इंदापूर, माळशिरस आणि फलटण तालुक्यात तपास केला. मात्र, काही धागेदोरे हाती लागले नव्हते.
त्याचदरम्यान, पोलीस या लाकडांबाबत माहिती घेताना ती लाकडे एका वखारीमधील असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर फलटण येथील गुणवरे गावातील एका वखारीत पोलिसांचे पथक पोहोचले. आरोपी दादासाहेब आणि विशाल हे दोघे अंत्यविधीसााठी लाकडे घेऊन गेल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा त्यांनी खुनाची कबुली दिली.
पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, कुलदीप संकपाळ यांच्या याप्रकरणाचा तपास केला.
हे सुद्धा वाचा : पुण्यात मोठा दरोडा टाकण्याचा प्लॅन फसला; ‘चूहा गँग’च्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला
जगताप नात्यातील एका महिलेकडे वाईट नजरेने बघत असल्याचा संशय आरोपी दादासाहेबला संशय होता. त्यामुळे त्याने मित्र विशाल याच्याशी संगनमत केले. जगताप यांना १५ नोव्हेंबर रोजी माण तालुक्यातील सतोबाची यात्रा येथे जाऊ, असे सांगितले. त्यानंतर इंदापुर येथील तावशी गावातील स्मशानभुमीजवळ त्यांनी गाडी थांबवली. तेथे जगताप यांच्या डोक्यात दांडके मारुन खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी मृतदेह स्मशानभुमीत जाळून टाकला.