
धक्कादायक ! पती-पत्नीमधील वाद गेला टोकाला; पत्नीची हत्या करून पती फरार
नाशिक : कळवण तालुक्यातील मानूर येथे पती-पत्नीमधील वादातून पत्नीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी घडली. बहिणीच्या घरी पाहुणे म्हणून आलेल्या दाम्पत्यामध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर पतीने पत्नीला मारहाण करून ठार केल्याचा प्राथमिक आरोप असून, त्यानंतर पती फरार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोरपाडा पोस्ट पिंपळे खुर्द येथील रहिवासी विलास दत्तू गायकवाड आणि त्यांची पत्नी अंजना विलास गायकवाड हे मानूर येथे त्यांच्या बहिणीच्या घरी पाहुणे म्हणून आले होते. सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घरात कोणी नसल्याचा फायदा घेत विलास गायकवाड याने पत्नी अंजना यांच्यावर छाती, पोट व पाठीवर जबर मारहाण केली, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या मारहाणीत अंजना यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
हत्येमागील अन्य कारणांचा तपास सुरू
घटनेनंतर संशयित पती विलास गायकवाड हा घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच कळवण पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून, फरार पतीच्या शोधासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहे. कळवणचे पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास ठोंबरे तसेच पोलीस हवालदार मन्साराम बागुल, निलेश शेवाळे, संतोष गवळी आणि तुषार देवरे यांचे पथक संशयित विलास गायकवाड याचा शोध घेत आहे.
वाद नेमका कशासाठी?
या घटनेमुळे मानूर परिसरात खळबळ उडाली असून, नेमका वाद कशामुळे झाला आणि हत्येमागील अन्य कारणे काय आहेत, याचा तपास कळवण पोलीस करत आहेत.
प्रियकराने आवळला महिलेचा गळा
दुसऱ्या एका घटनेत, नात्यांमध्ये विश्वास आणि आपुलकी असेल तर वयाचा फरक अनेकदा गौण ठरतो. मात्र, त्याच नात्यात संशय, हट्ट आणि वाद वाढत गेले तर परिस्थिती किती गंभीर होऊ शकते, याचा धक्कादायक अनुभव नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात आला आहे. एका ४५ वर्षीय महिलेचा तिच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान असलेल्या प्रियकराने गळा आवळून जीव घेतल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून निघून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.