
नवी दिल्ली : आपल्यापैकी अनेकजण अंडी खात असतील. मात्र, ही अंडी कधीची असतात हे सांगणे कठीण होते. कारण, ही अंडी अनेक दिवसांची देखील असू शकतात. त्यामुळेच आता उत्तर प्रदेश सरकारने अंड्यांच्या व्यापारावर कडक नियंत्रण आणले आहे, यामुळे ताजी अंडी असल्याचा दावा करून जुनी अंडी विकणाऱ्यांना ते अशक्य झाले आहे. १ एप्रिलपासून, उत्तर प्रदेश सरकारने प्रत्येक अंड्यावर मुदत समाप्तीची तारीख छापणे अनिवार्य केले आहे. उत्तर प्रदेश सरकारने ग्राहकांच्या आरोग्यासाठी एक क्रांतिकारी पाऊल उचलले असून, आता प्रत्येक अंड्यावर 'मॅन्युफॅक्चरिंग' आणि 'एक्सपायरी डेट' छापणे अनिवार्य केले आहे. यामुळे ग्राहकांना अंडे किती जुने आहे आणि ते खाण्यासाठी सुरक्षित आहे का, हे स्वतः तपासून घेता येईल. अनेकदा आपल्याला अंडी किती जुनी आहेत हे कळत नाही. तज्ज्ञांच्या मते, सामान्य तापमान अंडी केवळ २ आठवडे चांगली राहतात. थंड तापमान (२ ते ८C) फ्रिजमध्ये ठेवल्यास ५ आठवड्यांपर्यंत अंडी वापरता येतात. त्यामुळे आता अंड्यांची एक्सपायरी डेट तुम्हाला समजू शकणार आहे. यानुसार, नियमावली तयार केली गेली आहे. जर एखाद्या दुकानदाराने नियमांचे उल्लंघन केले, तर त्यांची अंडी जप्त केली जातील. ही अंडी एकतर नष्ट केली जातील किंवा ती 'मानवी सेवनासाठी असुरक्षित' असल्याचे शिक्कामोर्तब केले जाईल. विभागाने कडक तपासणी मोहिमेचे संकेत दिले आहेत. नियमांचे पालन करावे लागणार उत्तर प्रदेशात सध्या आग्रा आणि झाशी येथे मुख्य शीतगृहे आहेत. अन्न सुरक्षा नियमांनुसार अंडी आणि भाज्या एकाच जागी ठेवता येत नाहीत. त्यामुळे, सुविधा मर्यादित असल्या तरी सरकारने आता कडक शब्दांत ताकीद दिली आहे की, 'सुविधा नाही' ही सबब चालणार नाही, नियमांचे पालन करावेच लागेल.
यंदा प्रथमच अंड्याचा शेकडा दर ७२० रुपये शेकड्यापर्यंत गेला असल्यामुळे अंड्याचे बाजार भाव घाऊक बाजारात मोठ्या प्रमाणावर वाढले असून, किरकोळ अंडे ८ रुपये प्रमाणे ९६ रुपये डझन विकले जात आहेत. यंदा प्रथमच अंड्याचा बाजारभाव ७२० रुपये शेकड्यापर्यंत गेला असल्याचे अंडी उत्पादक शेतकरी गोविंद थोरात, निकेतन दैने, माया थोरात यांनी सांगितले आहे. तसेच बॉयलर कोंबडी यांचा लिफ्टिंग रेट दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे बाजारभाव १२२ रुपये किलोच्या पुढे गेल्यामुळे बॉयलर कोंबडीचे चिकन किरकोळ विक्रते सध्या २२० ते २४० रुपये किलो दराने विकले जात असल्याची माहिती कळंब येथील ख्वाजा गरीब नवाज चिकन सेंटरचे विक्रेते इसाक शेख, महाराष्ट्र चिकनचे इम्रान मोमीन, भारत चिकनचे व होलसेल कोंबडीचे व्यापारी जावेद मिस्त्री, फिरोज मिस्त्री यांनी दिली.
गेली काही महिने अंड्याचे दर गडगडल्याने अनेक अंडी उत्पादक शेतकऱ्यांनी उत्पादन बंद केले होते. त्यामुळे अंड्याचा तुटावडा जाणवतो. त्यामुळे बाजारभाव वाढल्याची शक्यता वर्तवली जात आहे. – प्रमोद हिंगे पाटील (ऊर्जा फूड्स प्रायव्हेट लिमिटेड, निरगुडसर फाटा)
बकऱ्याच्या मटणाला दिवसेंदिवस मागणी वाढत चालली असून बकऱ्याचे मटण ७६० ते ८०० रुपये किलो दराने विकले जात असल्याची माहिती एकलहरे येथील चॉईस मटन शॉप बकराचे व्यापारी शेखर कांबळे, मंचरचे बाबा मटणचे शारुफ इनामदार यांनी दिली. ढाब्यांवर मार्गशीर्ष महिन्यात मोठ्या प्रमाणावर मांसाहाराला उठाव असल्याचे कळंब येथील तिरंगा धाब्याचे नितीन भालेराव, यशोधनचे तन्मय कानडे, एकलहरे येथील हॉटेल व्यवसायिक रामचंद्र गाडे, अर्जुन डोके, निलेश डोके यांनी सांगितले.
थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे चिकन-मटनलाही मागणी वाढली आहे. बाजारपेठेत चिकन-मटन याचे उत्पादन कमी असून, मागणी जास्त असल्यामुळे बाजारभाव वाढल्याची शक्यता आहे. -शफीभाई मोमीन, आंबेगाव ऍग्रो शिनोली.