सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : अवकाळी पावसाने शहराला जाेरदार तडाखा दिल्यानंतर प्रशासन जागे झाले आहे. साेमवारपासून नालेसफाईची कामे हाती घेतली जातील असे आयुक्त नवल किशाेर राम यांनी स्पष्ट केले. पावसाची तीव्रता लक्षात घेत स्थायी समितीची बैठक सुरु असतानाच आयुक्त नवल किशाेर राम यांनी खाते प्रमुखांना पाणी साठण्याच्या ठिकाणावर पाेहचून पाण्याचा निचरा करण्याच्या सुचना दिल्या हाेत्या. त्यामुळे कमीत कमी वेळेत कर्मचारी, अधिकारी ‘ऑन फिल्ड’ हाेते असा दावाही प्रशासनाने केला आहे.
भारत सरकारच्या नियमानुसार पावसाचे पाणी वाहून नेण्याची क्षमता सध्याच्या उपलब्ध नैसर्गिक नाल्यात नाहीत. सध्या आपल्याकडे ५० ते ६० मिमी पाऊस पडल्यानंतर पाण्याचा निचरा हाेईल अशी गटार व्यवस्था आहे. मात्र, प्रत्यक्षात आपल्याकडे १३० मिमी पाऊस पडल्यानंतरही शहरात पाणी तुंबणार नाही अशी यंत्रणा उभी करावी लागणार आहे, असे आयुक्त नवल किशाेर राम यांनी नमूद केले.
रस्त्यांचे डांबरीकरण होणार, सिमेंट नाही
गल्ली बाेळात सिमेंट काॅंक्रींटचे रस्ते केल्याने माेठ्या प्रमाणावर पाणी रस्त्यावर तुंबण्याचे निदर्शनास आले आहे. तसेच यासंदर्भात अनेक वेळा तक्रारी केल्या जात हाेत्या. आता पुढील काळात साडे सात मीटर रुंदींच्या रस्त्यांचे काम हे डांबरीकरणाच्या माध्यमातून केले जाईल. त्याठिकाणी सिमेंट काॅंक्रीटीकरण केले जाणार नाही, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. याविषयी लेखी आदेश काढण्याच्या सुचनाही त्यांनी पथ विभागाला केल्या आहेत.
पाणी तुंबण्याची कारणे शोधा
गेल्या काही वर्षापासून दरवर्षी महापालिकेकडून पावसाचे पाणी तुंबणाऱ्या ठिकाणांची माहीती घेऊन काम केले गेले. परंतु दरवर्षी याच ठिकाणी तुंबण्याच्या प्रकारात घट झाल्याचे दिसुन येत नाही, गुरुवारी झालेल्या पावसामुळे २६० ठिकाणी पाणी तुंबले हाेते. याची दखल आयुक्त नवल किशाेर राम यांनी घेत, कामे झालेल्या ठिकाणी पाणी का तुंबते याची कारणे सांगा असे आदेश संबंधित विभाग प्रमुखांना दिले आहेत. शहरात दरवर्षी पाणी तुंबणाऱ्या ठिकाणांची माहीती घेण्यात येते. त्यानुसार गेल्यावर्षी २२८ ठिकाणी पाणी साचत असल्याचा अहवाल समाेर आला हाेता. त्या ठिकाणी अत्यावश्यक उपाययाेजना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचा सुमारे १८५ काेटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मात्र, गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसाने या कामाचे पितळ उघडे केले आहे.






