
वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, घरखर्चाचा ताळमेळ बसेना; दरवाढीमुळे नागरिक हवालदिल
बाजारपेठेत टोमॅटो, कांदा, बटाटा यांसारख्या सर्वसामान्य भाज्यांचे दरही चढेच राहिले आहेत. त्यातच दूध, खाद्यतेल व किराणा सामानाच्या किंमती वाढल्याने गृहिणींचे बजेट विस्कळीत झाले आहे. घरखर्च भागविताना अनेकांना बचतीकडे पाठ फिरवावी लागत असून, काही कुटुंबांनी अनावश्यक खर्चाला कात्री लावण्यास सुरुवात केली आहे.
वाहनधारकांनाही इंधन दरवाढीचा मोठा फटका बसत आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे प्रवास खर्च वाढला असून, त्याचा परिणाम भाडेवाढ आणि मालवाहतुकीवरही होत आहे. परिणामी बाजारातील वस्तूंच्या किंमती आणखी वाढत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
रोजंदारीवर काम करणाऱ्यांना सर्वाधिक फटका
महागाईचा सर्वाधिक फटका रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगार, शेतमजूर आणि लहान व्यावसायिकांना बसत आहे. अनेकांच्या हाताला काम नसताना वाढत्या खर्चामुळे आर्थिक अडचणी अधिक तीव्र झाल्या आहेत. “दोन वेळच्या जेवणाची चिंता निर्माण झाली आहे,” अशी खंत काही नागरिकांनी व्यक्त केली. दरम्यान, वाढती महागाई नियंत्रणात आणण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती नियंत्रणात ठेवाव्यात तसेच सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.