
कुलूपबंद दवाखाना अन् डॉक्टर बेपत्ता, प्रशासनाचा निष्काळजीपणा; शेतकरी, पशुपालक अडचणीत
विशेष म्हणजे दवाखान्याच्या बाहेर कोणताही नामफलक किंवा पशुवैद्यकीय सेवेची माहिती दर्शविणारा फलक लावलेला नसल्याने हा दवाखाना सुरू आहे की कायमचा बंद, याबाबत ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पाबळ, पिंपळवाडी, खैरेनगर तसेच परिसरातील बारावाड्यांतील शेतकऱ्यांना गाई, म्हशी, शेळ्या, कोंबड्या आणि पाळीव कुत्र्यांच्या उपचारासाठी खासगी पशुवैद्यकीय सेवांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे आर्थिक भार वाढत असून, तातडीच्या उपचारांमध्ये विलंब होत असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले. शासनाने लाखो रुपये खर्च करून उभारलेली ही इमारत वापराअभावी निष्क्रिय झाली असून, प्रशासन व संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. “दवाखाना सुरू असेल तरच शेतकरी येतील, पण येथे कायम कुलूपच दिसते,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नेमण्याची मागणी
दरम्यान, या दुर्लक्षामुळे पशुधनाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, वेळेवर उपचार न मिळाल्यास जनावरांच्या जीवितालाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नेमून दवाखाना सुरू करावा, अशी जोरदार मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.