
शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा! कर्जमाफी योजनेला ब्रेक; पुढील आठवड्यात अंमलबजावणीची शक्यता
दरम्यान, या विलंबामागील कारण आता समोर आले आहे. पात्र लाभार्थ्यांची अचूक पडताळणी करण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे इन्कम टॅक्सशी संबंधित माहिती मागवली आहे. हा डेटा प्राप्त झाल्यानंतरच कर्जमाफी योजनेची अंतिम अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
शासनाकडून कर्जमाफीचा लाभ केवळ पात्र शेतकऱ्यांनाच मिळावा, यासाठी विविध विभागांकडील माहितीची पडताळणी केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्राकडून आयकरविषयक माहिती मागविण्यात आली आहे. संबंधित डेटा मिळाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी अंतिम करण्यात येणार असून त्यानंतर कर्जमाफीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्राकडून आवश्यक माहिती प्राप्त झाल्यानंतर पुढील आठवड्यात कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये कर्जमाफीचा लाभ जमा करण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते.
कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर अनेक शेतकरी या योजनेच्या अंमलबजावणीकडे डोळे लावून बसले आहेत. मात्र, मुदतीवर मुदती वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. खरीप हंगाम सुरू असताना आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळावा, अशी मागणी विविध शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे. राज्य सरकारकडून आता केंद्राकडील माहिती मिळाल्यानंतर कर्जमाफीची प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लाखो शेतकऱ्यांचे लक्ष आता सरकारच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.
दरम्यान, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेनुसार शेतकऱ्यांना दोन लाखांची कर्जमाफी आणि नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50 हजार रुपयांची सूट अशी घोषणा करण्यात आली होती. राज्यातील महायुती सरकारने शेतकरी कर्जमाफीची योजना जाहीर केली आहे. मात्र, अंमलबजावणी पुन्हा लांबणीवर पडली असल्याचे समोर आले आहे. राज्य सरकारने केंद्राकडे इन्कम टॅक्ससंदर्भात माहिती मागवली आहे.