
गावठी दारूच्या सेवनाने वीस नागरिकांचा मृत्यू
अल्कोहोलिक आणि बिनअल्कोहोलिक पेयांच्या गुणवत्तेवर काम करण्याची गरज
आगामी काळात मद्यावर कारवाई करण्याचे नियोजन
पुणे: ‘पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात काही दिवसांपूर्वी गावठी दारूच्या सेवनाने वीस नागरिकांचा मृत्यू झाला. चुकीच्या रसायनांचा वापर झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. हा गंभीर विषय असल्याने याकडे लक्ष देण्यासाठी गरज आहे. तसेच अल्कोहोलिक आणि बिनअल्कोहोलिक पेयांच्या गुणवत्तेवर काम करण्याची गरज आहे. सध्या राज्यात अन्न पदार्थांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनावर ताण आहे. मात्र, आगामी काळात मद्यावर कारवाई करण्याचे नियोजन असून त्यावर कारवाई करण्यात येईल,’ असे तुकाराम मुंढे यांनी सांगितले.
मद्याची गुणवत्ता, उत्पादन आणि त्यावरील माहिती हे विषय अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकारात येतात. एफडीएच्या कार्यालयात मद्याबाबत तक्रारीही येत असल्याने आता मद्याच्या गुणवत्तेकडे लक्ष देत आगामी काळात कारवाईचे नियोजन करण्यात आले आहे. दूध, पनीर, तेल यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंसोबत आता मद्य आणि चायनीज पदार्थांच्या गुणवत्तेचीही तपासणी केली जाणार असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी स्पष्ट केले. माय जनसेवक आणि पुणे लोकल यांच्या वतीने मुंंढे यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुंढे बोलत होते. कवी अरविंद जगताप आणि महाराष्ट्र टाइम्सचे विशेष प्रतिनिधी प्रशांत आहेर यांनी मुंढे यांची मुलाखत घेतली.
Nagpur News : सावजी वरून बावनकुळे आक्रमक ; मुंडेंना इशारा , रेस्ट्रॉरंट बंद पडतील अशी विधाने करू नका
मुंढे म्हणाले, ‘अन्न सुरक्षा हा प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय आहे. त्यामुळे दूध, पनीर, तेल यांसारख्या रोजच्या वापरातील वस्तूंच्या गुणवत्तेला प्राधान्य दिले जात आहे. पूर्वी संसर्गजन्य आजारांचे प्रमाण अधिक होते. मात्र, आता उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना भेसळमुक्त अन्न पदार्थ मिळणे आवश्यक आहे. भेसळ रोखण्यासाठी उत्पादक, प्रशासन आणि नागरिक या तिन्ही घटकांनी आपली जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे. उत्पादकांनी दर्जेदार पदार्थ तयार करावेत, प्रशासनाने तपासणी करून देखरेख ठेवावी आणि नागरिकांनी संशयास्पद प्रकार आढळल्यास प्रश्न विचारावेत. तिन्ही घटकांनी योग्य काम केल्यास भेसळ रोखणे शक्य आहे.’
‘अन्नविषयक तक्रारी नोंदविण्यासाठी सुरू केलेल्या पोर्टलवर तीन आठवड्यांत सुमारे तीन हजार तक्रारी आल्या असून, त्यात पुणे जिल्ह्यातील तक्रारी सर्वाधिक आहेत. अधिकारी येतील-जातील; मात्र प्रशासनाने सातत्याने चांगले काम केले पाहिजे. परिस्थिती किंवा मनुष्यबळाच्या कमतरतेला दोष देत बसण्यापेक्षा त्यावर मात करून काम करण्याची गरज आहे,’ असे मुंढे यांनी सांगितले.
समाज माध्यमांचा वापर करताना युवकांनी स्वतःची विचार करण्याची क्षमता जपावी. समाज माध्यमांचा वापर करणे चुकीचे नाही. मात्र, त्याचा किती वापर करायचा हे महत्त्वाचे आहे. तरुणांनी योग्य गोष्टींच्या प्रेमात पडून जीव ओतून काम करावे आणि स्वतःचे अस्तित्व स्वतः निर्माण करावे, असे आवाहन मुढे केले. मिलिंद कुलकर्णी सूत्रसंचालन केले. अमित रुके आणि विरेश आंधळकर यांनी प्रास्ताविक केले.