
संततधार पावसाने बळीराजाला दिलासा; उत्तर पुणे जिल्ह्यात खरीप पिकांच्या लागवडीला वेग
वळती : उत्तर पुणे जिल्ह्यात शनिवारी दमदार पावसाने हजेरी लावत वातावरणात गारवा निर्माण केला. दिवसभर संततधार पाऊस सुरू असल्याने सूर्यदर्शन झाले नाही. जून महिन्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप हंगामाबाबत चिंतेत असलेल्या शेतकरी वर्गाला या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. जुलैच्या सुरुवातीलाच वरुणराजाने जोरदार हजेरी लावल्याने शेतमशागत आणि खरीप पेरणीच्या कामांना वेग आला असून शेतांमध्ये पुरेसा ओलावा निर्माण झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाअभावी खरीप हंगाम धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत होती. शेतकऱ्यांनी पूर्वमशागत पूर्ण केली होती; मात्र पाऊस न झाल्याने पेरण्या रखडल्या होत्या. गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे शेतकरी पुन्हा जोमाने शेतात उतरले आहेत. खरीप पिकांच्या लागवडीला वेग आला असून परिसरात समाधानाचे वातावरण आहे. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागाबरोबरच पूर्व भागातही चांगल्या सरी कोसळल्या आहेत. घाटमाथ्यावरही पावसाचा जोर कायम असून पावसामुळे खरीप हंगामाबाबत आशादायक चित्र निर्माण झाले आहे. पावसाचा काही प्रमाणात बाजारपेठेतील व्यवहारांवर परिणाम झाला असला, तरी व्यापारी वर्गानेही समाधान व्यक्त केले आहे. अशीच पावसाची संततधार कायम राहिल्यास परिसरातील नद्या, नाले आणि ओढे लवकरच तुडुंब भरून वाहतील, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
भीमाशंकर पट्ट्यात चांगल्या सरी; डिंभे धरणाला आणखी पावसाची गरज
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील भीमाशंकर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. मात्र डिंभे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजूनही मोठ्या प्रमाणात पावसाची आवश्यकता आहे. जून महिन्यापासून मोसमी पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतीची पूर्वमशागत पूर्ण केली होती. पावसाने दडी मारल्याने खरीप पेरण्यांना विलंब झाला; मात्र आता दमदार सरींमुळे शेतकऱ्यांमध्ये नव्या आशा निर्माण झाल्या आहेत. पश्चिम खोऱ्यात आणखी काही दिवस जोरदार पाऊस झाल्यास धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
अनेक भागांत पावसासाठी अनुकूल वातावरण
दहा-बारा दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह पावसाची चिन्हे दिसली होती; मात्र प्रत्यक्षात पाऊस झाला नव्हता. गेल्या दोन-तीन दिवसांपासून वातावरणात बदल होऊन अनेक भागांत संततधार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे पंधरा दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून खरीप हंगामाला नवसंजीवनी मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.