
पालखी सोहळ्यासाठी शासनाची जोरदार तयारी; मागील वर्षीपेक्षा जास्त चांगल्या सुविधा मिळणार
सासवड : आगामी दोन आठवड्यात संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांचे पालखी सोहळे क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी यात्रेसाठी जात असून, याबाबत शासनाची संपूर्ण तयारी झाल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले. यापूर्वी चार ते पाच आढावा बैठका झाल्या असून, प्रत्येक आठवड्याला आढावा घेण्यात येत आहे.
वारकरी आणि भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वीज, पाणी, रस्ते, औषधे, आरोग्यसेवा तसेच वारकऱ्यांची सुरक्षा याबाबतीत शासन अत्यंत गंभीर आहे. प्रत्येक वेळी नवनवीन उपक्रम राबवीत असून मागील वर्षीपेक्षा आणखी चांगली सुविधा देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.
संत सोपानदेव पालखी सोहळ्याला वेग; पालखीचे 12 जुलै रोजी पंढरपूरकडे प्रस्थान
पुरंदर विमानतळ प्रकल्पाच्या जागेचे भूसंपादन सुरु असून शेतकऱ्यांच्या विविध अडीअडचणी, हरकती सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी डुडी सासवडला आले होते. यावेळी त्याच्याशी चर्चा केली असता खते बियाणांचा कोणत्याही प्रकारे तुटवडा येणार नाही, यासाठी शासनाची सर्व तयारी असल्याचे सांगितले.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी सतीश राऊत, भूसंपादन अधिकारी कल्याण पांढरे, प्रांताधिकारी वर्षा लांडगे, संगीता चौघुले, तहसीलदार विक्रम राजपूत, संदीप पाटील, तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण, भूमी अभिलेख अधिकारी स्मिता गौड तसेच विविध विभागाचे प्रतिनिधी आणि शेतकरी उपस्थित होते.
पुरंदर तालुक्यातील बेलसर, कोडीत, राजेवाडी आदी परिसरातील शासनाच्या गायरान जमिनीवर सौर उर्जा प्रकल्प होत असून, स्थानिक नागरिकांचा याला प्रखर विरोध होत आहे. शासन प्रकल्प बाबतीत जबरदस्ती करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप होत आहे. याबाबत प्रश्न उपस्थित केला असता पुणे जिल्ह्यातील शासकीय जागेत शासन सौरऊर्जा प्रकल्प करणार असल्याचे जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.
सध्या विजेचे दिवसेंदिवस भाव वाढत असून, शेतकऱ्यांना वीज परवडेनासी झाली आहे. आणि सौरऊर्जा प्रकल्पातून मिळणारी वीज अत्यंत कमी पैशात मिळणार असल्याने शेतकऱ्यांची मोठी बचत होणार आहे. यासाठी केंद्र सरकार अनुदान देत असून महाराष्ट्रातील सौरऊर्जा प्रकल्प देशासाठी पथदर्शी ठरणार आहे. बारामती, मोरगाव परिसरात सौरऊर्जा प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी यासाठी सकारात्मक प्रतिसाद देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डुडी यांनी केले आहे.