
व्यावसायिकांच्या मते, “सणासुदीला आजही ग्राहक पेठेतच येतात. येथे वस्तू पाहून, हाताळून आणि घासाघीस करून खरेदी करण्याचा अनुभव वेगळाच आहे. मात्र वर्षभरात सहज खरेदीसाठी अनेक ग्राहक मॉलकडे वळतात. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत नियमित ग्राहकांची संख्या कमी झाली आहे.”
“मॉलमध्ये वातानुकूलित सुविधा, पार्किंग आणि एकाच ठिकाणी सर्व वस्तू मिळतात. त्यामुळे तरुण कुटुंबे तिकडे जातात. पण किफायतशीर दर आणि विविध पर्यायांसाठी ग्राहक अजूनही पेठेत येतात. आम्हालाही डिजिटल पेमेंट, सोशल मीडिया आणि होम डिलिव्हरीसारखे पर्याय स्वीकारावे लागले आहेत.”
व्यापाऱ्यांच्या मते, पेठेतील वाहतूक कोंडी, पार्किंगची कमतरता आणि अरुंद रस्ते ही मोठी समस्या ठरत आहे. दुसरीकडे मॉलमध्ये आरामदायी वातावरण, फूड कोर्ट आणि मनोरंजनाची सुविधा असल्याने खरेदी हा अनुभव बनला आहे. त्यामुळे विशेषतः तरुण ग्राहकांचा कल मॉलकडे वाढत असल्याचे दिसत आहे.
तथापि, गणेशोत्सव, दिवाळी, गुढीपाडवा, लग्नसराई यांसारख्या हंगामात लक्ष्मी रस्ता आणि तुळशीबाग परिसरात आजही मोठी गर्दी होत असल्याचे व्यापारी सांगतात. पारंपरिक वस्तू, धार्मिक साहित्य, दागिने, कपडे आणि पूजेच्या साहित्याच्या खरेदीसाठी पेठांना अजूनही प्राधान्य दिले जाते. पुण्यातील पारंपरिक पेठांना कधीच मरण नाही असे अजूनही दिसून येत आहे.
मॉल संस्कृती आणि पेठ संस्कृती यांच्यात स्पर्धेपेक्षा सहअस्तित्वाचे चित्र अधिक दिसत आहे. ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा लक्षात घेऊन पेठांमधील व्यावसायिकांनी आधुनिक तंत्रज्ञान, ऑनलाइन उपस्थिती आणि उत्तम ग्राहकसेवा स्वीकारल्यास पारंपरिक बाजारपेठांचे महत्त्व कायम राहू शकते.