उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस नेत्यांनी तात्काळ माफी मागावी अशी मागणी शेळकेंनी केली आहे.
वडगाव मावळ/ सतिश गाडे : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात मावळचे आमदार सुनील शेळके यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संबंधित काँग्रेस नेत्यांनी तात्काळ जाहीर माफी मागावी, अन्यथा मावळातील नागरिकांचा तीव्र जनआक्रोश उभा राहील, असा इशारा त्यांनी दिला आहे.
आमदार शेळके म्हणाले की, सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या महिला नेत्यांविषयी अपमानास्पद, अवमानकारक किंवा असभ्य भाषा वापरणे ही महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला आणि सामाजिक मूल्यांना शोभणारी बाब नाही. राजकीय मतभेद, टीका किंवा आरोप-प्रत्यारोप हे लोकशाही व्यवस्थेचा भाग असले तरी त्यासाठी महिलांचा अवमान करणे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह ठरू शकत नाही.
“महिलांचा सन्मान राखणे ही प्रत्येक राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची सामूहिक जबाबदारी आहे. कोणत्याही महिलेविषयी अश्लाघ्य किंवा अवमानकारक वक्तव्य करून राजकारण करण्याचा प्रयत्न हा निषेधार्ह आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले. सुनेत्रा पवार यांच्याविषयी करण्यात आलेल्या वक्तव्यामुळे अनेक नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून, अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण दूषित होण्याची भीती व्यक्त होत आहे. संबंधित व्यक्तींनी आपल्या वक्तव्याबद्दल सार्वजनिकरित्या दिलगिरी व्यक्त करून जाहीर माफी मागावी, अशी मागणी आमदार शेळके यांनी केली.
यापुढे अशा प्रकारची भाषा सहन केली जाणार नाही. महिलांच्या सन्मानाच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाम भूमिका घेईल आणि आवश्यक असल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांकडूनही संताप व्यक्त केला जात असून, महिलांचा सन्मान अबाधित राखण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी संयमित भाषा वापरण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. संबंधित काँग्रेस नेत्यांनी तातडीने माफी मागून आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विविध स्तरांतून होत असल्याचेही आमदार सुनील शेळके यांनी सांगितले.