
गुंजवणीच्या पाण्यासाठी किडनी मी घालवली, पण...; विजय शिवतारेंनी रुग्णालयातून व्यक्त केल्या भावना
सासवड : पुरंदरच्या जनतेला गुंजवणी धरणातील हक्काचे पाणी मिळावे. यासाठी सासवडच्या पालखी तळावर १३ दिवस उपोषण केले. त्यानंतरच्या काळात शारीरिकदृष्ट्या सक्षम नसतानाही पुरंदरच्या विकासाची गंगा थांबवू दिली नाही. त्या उपोषणानंतर माझी किडनी खराब झाली. मात्र, देवाने माझ्या मुलीच्या रूपाने पुन्हा एकदा संधी दिली. ज्या कामासाठी उपोषण केल्याने किडनी खराब झाली, ते पाण्याचे काम देवाने माझ्याकडूनच करून घेतल्याचे समाधान वाटत आहे. अशा शब्दात पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
आमदार विजय शिवतारे यांच्यावरील किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया नुकतीच करण्यात आली. त्यांची कन्या ममता शिवतारे-लांडे यांनी त्यांना किडनी दान करून नवीन आयुष्य दिले आहे. सध्या आमदार शिवतारे मुंबईच्या ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांनी रुग्णालयातून व्हिडीओच्या माध्यमातून पुरंदर हवेलीतील जनतेशी संवाद साधला आहे.
पालखी तळावर २०१२ मध्ये उपोषण केले होते. तेव्हापासून मला किडनीचा त्रास जाणवत होता. २०२० पासून रक्त शुद्धीकरण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर बायपास झाली. दिवसाआड डायलिसीस सुरू आहे. तब्बल सहा तास प्रक्रिया सुरु असते. मागील अधिवेशन दरम्यान ऑगस्टपासून त्रास होत होता. डॉक्टरांनी किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया तातडीने करण्याची सूचना केली होती. मात्र, त्याकडे मी दुर्लक्ष करून तालुक्याची विकासकामे कशी पूर्ण होतील, याकडे लक्ष देत होतो.
तिच्यामुळे मला आयुष्य मिळाले
माझी कन्या ममता शिवतारे लांडे यांनी किडनी देणार, असे सांगितले होते. त्यानंतर ३० मार्च रोजी किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर सलग चार दिवस आयसोलेशनमध्ये होतो. प्रचंड औषधे असल्याने खूप त्रास झाला. अद्यापही झोपही येत नाही. सर्व औषध उपचार सुरू असून धोका पूर्णपणे टळला आहे. बाप आणि लेकीचे आयुष्य काय असते, हे ममताने दाखवून दिले. तिच्यामुळे मला आयुष्य मिळाले आहे, असे विजय शिवतारे यांनी सांगितले.
पुरंदरची मुंबई करायची आहे
माझ्या कन्येने देवाच्या रुपात येवून मला जीवनदान दिले. पुढील काळात आमदार म्हणून नाही तर पुरंदर हवेलीचा कुटुंब प्रमुख म्हणूनच काम करायचे आहे. आता पुरंदरला मुंबई करायची असून उद्याची नवी मुंबई पुरंदरलाच पहायची आहे. नवनवीन उद्योग, नोकरी निर्माण करण्याचे धोरण आहे. मला मामतामुळे मोठे आयुष्य मिळाले आहे. पुढील काळात आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प, आयटी पार्क, यातून हजारो हाताना काम मिळणार आहे. नवी मुंबई पुरंदरलाच पाहायला मिळणार आहे, असा विश्वास आमदार विजय शिवतारे यांनी व्यक्त केला आहे.