
वाईच्या पश्चिम भागातील उत्खनन प्रकरण तापले; दोषींवर कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
राष्ट्रीय मराठा महासंघाचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम वाघ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन सादर केले. निवेदनात वाई तालुक्याच्या पश्चिम भागात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बेकायदा उत्खनन सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर भूस्खलनाच्या घटना घडल्या असून, त्यामुळे शेती, घरे, रस्ते आणि पुलांना गंभीर धोका निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
जिल्हा अतिवृष्टीच्या संकटात असतानाच सार्वजनिक बांधकाम अधिकारी गेले सहलीवर; नागरिकांमधून संताप
संघटनेच्या म्हणण्यानुसार, स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महसूल विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले. बेकायदा उत्खनन रोखण्यासाठी कोणतीही प्रभावी कारवाई किंवा महसूल वसुली करण्यात आली नसल्याने या प्रकाराला अधिकाऱ्यांचे मूक समर्थन मिळाल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
मराठा महासंघाने या प्रकरणी संबंधित महसूल अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच भूस्खलनग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे करून बाधित नागरिकांना आर्थिक मदत व दिलासा देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
संघटनेने भविष्यात अशा प्रकारचे बेकायदा उत्खनन रोखण्यासाठी कठोर उपाययोजना राबविण्याची मागणी केली आहे. या सर्व मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठे आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा राष्ट्रीय मराठा महासंघाने दिला आहे.
वाईच्या पश्चिम भागातील बेकायदा उत्खननाची तातडीने चौकशी करावी.
संबंधित महसूल अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी.
दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी.
भूस्खलनग्रस्त भागांचे पंचनामे करून बाधितांना तातडीने मदत द्यावी.
भविष्यात बेकायदा उत्खनन रोखण्यासाठी कठोर आणि प्रभावी उपाययोजना राबवाव्यात.
वडूजलाच अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय व्हावं; खटाव-माण तालुका जनसंघर्ष समितीची मागणी