
पहिल्याच दिवशी ८ हजारांहून अधिक नागरिकांची स्व-गणना
पुणे : भारताच्या १६ व्या जनगणनेला 1 मे पासून सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत पुणे जिल्ह्यात आठ हजारांहून अधिक नागरिकांनी स्व-गणना पूर्ण केली आहे, अशी माहिती अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत यांनी दिली.
जनगणना कायदा १९४८ अंतर्गत राबविण्यात येणारा हा महत्त्वाचा राष्ट्रीय उपक्रम असून, प्रभावी धोरणनिर्मिती व जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अचूक व विश्वसनीय माहितीचा (डेटा) संग्रह अत्यावश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी ही आपली जबाबदारी समजून स्व-गणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन राऊत यांनी केले.
जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यास जिल्ह्यात 1 मे रोजी प्रारंभ झाला असून, नागरिकांनी https://se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर १५ मे २०२६ पर्यंत स्व-गणना पूर्ण करावी. ही प्रक्रिया ऐच्छिक आहे. त्यानंतर १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत प्रगणक घरभेटी देऊन माहिती संकलन करणार आहेत.
केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत यंदा जनगणना व्यापक प्रमाणात डिजिटल पद्धतीने राबविण्यात येत आहे. भारतीय जनगणनेच्या इतिहासात प्रथमच स्व-गणना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून नागरिकांना आपला कौटुंबिक तपशील ऑनलाइन भरता येणार आहे.
कुटुंबातील कोणताही एक सदस्य सुमारे १५ ते २० मिनिटांत ही प्रक्रिया पूर्ण करू शकतो. माहिती सादर केल्यानंतर स्व-गणना आयडी (एसईआयडी) तयार होऊन तो नोंदणीकृत मोबाईल क्रमांक किंवा ई-मेलवर पाठवला जाईल. या प्रक्रियेसाठी कोणतेही दस्तऐवज अपलोड करण्याची आवश्यकता नाही.
दरम्यान, घरगुती यादीकरणासाठी जिल्ह्यात सुमारे १३ हजार प्रगणक व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले असून पाच-स्तरीय प्रशिक्षण प्रणाली राबविण्यात आली आहे. डेटा सुरक्षेसाठी बहु-स्तरीय संरक्षण व्यवस्था लागू करण्यात आली असून, केवळ अधिकृत कर्मचाऱ्यांनाच सुरक्षित प्रवेश दिला जाणार आहे.
कशी होणार जनगणना?
केंद्रीय मंत्रिमंडळाने पुढील वर्षी म्हणजेच २०२७ मध्ये जनगणना करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जरी मूळतः २०२१ मध्ये करण्याचे नियोजन असले तरी, ती सहा वर्षांनी पुढे ढकलण्यात आली आहे. कोविड-१९ साथीच्या आजारामुळे २०२१ ची जनगणना पुढे ढकलण्यात आली. पहिल्यांदाच, ही पूर्णपणे डिजिटल जनगणना असेल, ज्यामध्ये जातींची जनगणना समाविष्ट असेल.