
पिंपरी-चिंचवड महापालिका राज्यात अव्वल! 'माझी वसुंधरा' अभियानात सलग तिसऱ्यांदा प्रथम क्रमांक
पिंपरी : पर्यावरण संवर्धन, शाश्वत विकास आणि हरित उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. राज्य सरकारच्या ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ अंतर्गत १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात पिंपरी-चिंचवडने प्रथम क्रमांक पटकावत सलग तिसऱ्यांदा राज्यात अव्वल येण्याची ‘हॅट्ट्रिक’ साधली आहे. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल महापालिकेला १० कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे.
दिमाखदार सोहळ्यात गौरव
२१ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित एका विशेष राज्यस्तरीय सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. महापौर रवि लांडगे आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि पुरस्काराची राशी स्वीकारली. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, सचिव जयश्री भोज, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल आणि जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आदी मान्यवर उपस्थित होते.
“सलग तिसऱ्यांदा राज्यात प्रथम येणे हा प्रत्येक पिंपरी-चिंचवडकरासाठी अभिमानाचा क्षण आहे. हे यश केवळ प्रशासनाचे नसून शहरातील नागरिक, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी आणि उद्योगांच्या सक्रिय सहभागाचे फलित आहे. हा सन्मान शहरवासियांच्या पर्यावरणप्रेमी वृत्तीला समर्पित आहे.” — रवि लांडगे, महापौर, पिंपरी-चिंचवड
अशी झाली कामगिरीची मोजणी
१ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत राबविण्यात आलेल्या या अभियानात ‘पंचमहाभूतांवर’ आधारित निकषांवर शहराची चाचणी घेण्यात आली. यात प्रामुख्याने खालील बाबींमध्ये शहराने उत्कृष्ट कामगिरी केली
“शाश्वत विकासासाठी आम्ही आधुनिक तंत्रज्ञान आणि पारदर्शक अंमलबजावणीवर भर दिला आहे. जनसहभागामुळेच आम्ही हे उद्दिष्ट गाठू शकलो. भविष्यात पिंपरी-चिंचवडला अधिक हरित आणि प्रदूषणमुक्त बनवण्याचा आमचा निर्धार आहे.”— श्रावण हर्डीकर, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका
विषय समित्यांवर सदस्यांची निवड
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या झालेल्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीसह विविध पाच महत्त्वाच्या विषय समित्यांवर सदस्यांची अधिकृत निवड करण्यात आली. महापौर रवी लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत पक्षीय बलाबलानुसार सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. पिठासीन अधिकारी या नात्याने महापौर रवी लांडगे यांनी या नावांची अधिकृत घोषणा केली. “महानगरपालिकेच्या विकासात्मक, सामाजिक आणि प्रशासकीय कामकाजात या समित्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. नव्याने निवड झालेले सदस्य शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक कार्य करतील,” असा विश्वास महापौरांनी यावेळी व्यक्त केला.